कोल्हापूरच्या विस्ताराला दक्षिणेकडेच सुरक्षित वाव दोन्ही महापुराने केले अधोरेखित : हद्दवाढ करतानाही पूरपातळीचा विचार आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:26 IST2021-07-30T04:26:09+5:302021-07-30T04:26:09+5:30
कोल्हापूर : तीन वर्षांतील छातीत धडकी भरवणाऱ्या दोन महापुरांचा अनुभव घेतल्यानंतर आता कोल्हापूर शहराच्या विस्ताराबाबत नव्याने विचार करण्याची गरज ...

कोल्हापूरच्या विस्ताराला दक्षिणेकडेच सुरक्षित वाव दोन्ही महापुराने केले अधोरेखित : हद्दवाढ करतानाही पूरपातळीचा विचार आवश्यक
कोल्हापूर : तीन वर्षांतील छातीत धडकी भरवणाऱ्या दोन महापुरांचा अनुभव घेतल्यानंतर आता कोल्हापूर शहराच्या विस्ताराबाबत नव्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. या शहराचा विस्तार आता पूर्व-दक्षिणेकडील बाजूंनीच व्हायला हवा, असेच नगरनियोजन आवश्यक आहे. रखडलेली हद्दवाढ करताना महापूर पातळी विचारात घेऊन नव्या गावांचा समावेश करण्याची गरज आहे. महापालिकेनेही तसा नवा प्रस्ताव पाठवण्याची आवश्यकता आहे. कोल्हापूर महापालिकेची सत्ता पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हातात आहे. ते जोपर्यंत हद्दवाढीबाबत खंबीर भूमिका घेत नाहीत तोपर्यंत हद्दवाढ होण्याची शक्यता नाही. तसा हा निर्णय प्रशासकीय कमी आणि राजकीय इच्छाशक्तीमुळेच रखडला आहे. कोल्हापूरच्या पूर्वेला राष्ट्रीय महामार्ग असल्याने विकासास मर्यादा आहेत. पश्चिमेकडील बाजूस पंचगंगा नदीपात्र येते. उत्तरेकडील भागही नदीपात्रालगत आणि जास्त बाधित क्षेत्रात येतो. त्यामुळे दक्षिणेकडील बाजूसच शहराच्या वाढीस चांगला वाव आहे.
महापुरामुळे कोल्हापूरची हद्दवाढ पुन्हा चर्चेत आली आहे. या प्रस्तावाची सद्य:स्थिती गुरुवारी ‘लोकमत’ने तपासली असता हद्दवाढीच्या प्रस्तावांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याच्या बाबतीत कोल्हापूरकरांना जो अनुभव काँग्रेस- राष्ट्रवादी सरकारमधील मंत्री, भाजपच्या मंत्र्यांकडून आला, तोच आता महाविकास आघाडीच्या सरकारकडूनही येत असल्याचा अनुभव आहे.
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. ८ जानेवारी २०२१ कोल्हापूरकरांच्या मागणीचा विचार करून हद्दवाढीचा सुधारित प्रस्ताव तात्काळ पाठवा, त्यावर लवकर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर लगेच आठ दिवसांत महपालिका प्रशासनाने नगरविकास विभागाकडे शहरालगतची १८ गावे आणि दोन एमआयडीसींचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविला. नगरविकासकडे प्रस्ताव जाऊन आता सहा महिन्यांचा कालावधी लोटला असून तो धूळखात पडला आहे.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून दीड वर्षात पुणे शहराची हद्दवाढ दोन वेळा झाली; पण कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवर निर्णय झालेला नाही. मंत्री शिंदे यांनी तात्काळ हद्दवाढ करून दिली जाईल, असे सांगितले होते. मात्र, त्यांनीही यात लक्ष घातलेले नाही. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर याबाबत पाठपुरावा करत आहेत; परंतु निर्णय झालेला नाही. राज्य शासनाला महानगरपालिकेने पाठविलेल्या पत्रात, १८ गावांतील सरपंच, नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली असल्याचा दावा करून या हद्दवाढीला विरोध होणार नसल्याचे म्हटले आहे; परंतु महापालिकेचा प्रस्तावच सदोष आहे. शहरातून वाहणाऱ्या पंचगंगा नदीच्या पलीकडील तीन गावे व एका औद्योगिक वसाहतीचा त्यात समावेश आहे. दोन्ही औद्योगिक वसाहतींचा आग्रह पालिकेने का धरला आहे, समजत नाही.
महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर सहा महिने अगोदरच्या कालावधीत तिच्या क्षेत्रात, हद्दीत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदल करता येणार नाही, असे २७ जानेवारी २००५ च्या राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशात म्हटले आहे. सध्या महापालिका निवडणूक कोरोनामुळे स्थगित आहे. त्यामुळे नगरविकास निवडणूक होईपर्यंत हद्दवाढीचा निर्णय घेईल, असे दिसत नाही.
-----
आताचा प्रस्तावच अव्यवहार्य
- हद्दवाढीच्या प्रस्तावातील गावे - शिये, वडणगे, आंबेवाडी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, नागदेववाडी, नवे बालिंगे, पीरवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कळंबे तर्फ ठाणे, शिरोली, उचगाव, शिंगणापूर, गोकुळ शिरगाव, नागाव, वळीवडे-गांधीनगर, मुडशिंगी. तसेच गोकुळ शिरगाव व शिरोली औद्योगिक वसाहत.
मोरेवाडी ते पीरवाडी विकासाचा टापू...
- सध्याच्या प्रस्तावातील वडणगे, शिंगणापूर, आंबेवाडी, शिये, गांधीनगर, शिरोली औद्योगिक वसाहत ही गावे पूरबाधित आहेत किंवा महापुरामुळे त्यांचा संपर्क तुटतो. त्यामुळे या गावांना वगळून उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव, हलसवडे, गोकुळ शिरगाव, कंदलगाव, मोरेवाडी, पाचगाव, कळंबा, पीरवाडी या गावांचा समावेश करण्याची गरज आहे. पहिल्या टप्प्यात मोरेवाडी ते पीरवाडी या टापूतील शहराला लागून असलेल्या गावांचाही विचार होऊ शकतो.
चक्रव्यूह भेदला पाहिजे...
यापूर्वी पन्नास-शंभर वर्षांतून एकदा महापूर येतो, असे म्हटले जायचे. बदललेल्या निसर्गाने आता हे ठोकताळे खोटे ठरवले आहेत. त्यामुळे महापुराचा धोका विचारात घेऊनच शहर विकासाचे नियोजन राबविण्याची गरज ठळक झाली आहे. अन्यथा दरवर्षी बचावकार्य, स्थलांतर, मालमत्तेचे नुकसान आणि जीवितहानीच्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे मुश्कील होईल.
शाहूंचे नुसते नाव नको...
कोल्हापूर हे शाहू महाराजांची कर्मभूमी म्हणून देशभर ओळखले जाते. त्यांनी शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी ज्या ज्या वास्तू उभ्या केल्या, त्यातील एकही वास्तू पूरबाधित क्षेत्रात येत नाही. त्यांनी या वास्तू बांधताना किती पुढचा विचार केला असेल हे त्यावरून दिसून येते. तसा लांब पल्ल्याचा विचार करून शहराच्या विकासाचे नियोजन झाले पाहिजे.
पॉइंटर -
- कोल्हापूर शहराची लोकसंख्या - ५,५०,५४१
- शहराचे सध्याचे क्षेत्र - ६६.८२ चौरस किलोमीटर
- शहराचे वार्षिक दरडोई उत्पन्न - ३८६५.७५ रुपये