कोल्हापुरात आता रिमोटवर चालणाऱ्या बोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 13:32 IST2020-07-04T13:10:30+5:302020-07-04T13:32:00+5:30
पुरात अडकलेल्यांना आता रिमोटवर चालणाऱ्या बोटींतून सुरक्षित स्थळी आणले जाणार असून, वित्त विभागाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला असून, गतवर्षी ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरामधील नुकसान भरपाईसाठी ४१ कोटींचा निधी आठ दिवसांत दिला जाणार आहे.

कोल्हापुरात आता रिमोटवर चालणाऱ्या बोटी
कोल्हापूर : पुरात अडकलेल्यांना आता रिमोटवर चालणाऱ्या बोटींतून सुरक्षित स्थळी आणले जाणार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. गतवर्षी ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरामधील नुकसान भरपाईसाठी ४१ कोटींचा निधी दिला जाणार असून, वित्त विभागाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला असून, आठ दिवसांत हा निधी जिल्हा आणि महापालिका प्रशासनाकडे वर्ग होईल, असेही त्यांनी सांगितले.
गतवर्षी महापुरात झालेली नुकसान भरपाई, आगामी आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजनेसाठी शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची आढावा बैठक झाली.
मंत्री वडेट्टीवार म्हणाले, पुरावेळी अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी आणण्यासाठी काही वेळेस बोटी उपलब्ध होत नाहीत; तसेच बोट उपलब्ध असल्यास चालवणाऱ्याचाही जीव धोक्यात येण्याची शक्यता असते.
या सर्वांचा विचार करून या वर्षी एखादी व्यक्ती जर ३०० मीटर पुरात अडकली असेल तर तिला रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या बोटीमधून सुरक्षित स्थळी आणले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत तीन कोटी १५ लाख रुपये जिल्हा प्रशासनाला दिले असून पाच कोटींचा निधी व्हेंटिलेटरसाठी दिला जाणार आहे.
एनडीआरएफचे ७५ जवानांचे पथक येणार
मागील वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत १०० मीटर जादा पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे महापुराचा धोका ओळखून सतर्क राहण्याची गरज आहे. ह्यएनडीआरएफह्णची तीन पथके लवकरच कोल्हापुरात दाखल होतील. एका पथकामध्ये २५ प्रमाणे ७५ जवानांचा यामध्ये समावेश असेल.
सध्या ८० बोटी सज्ज
राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापानातून कोल्हापूरला ४० एचपीच्या २५ नवीन बोटी खरेदीला मान्यता दिली आहे. तसेच रिलीफ फंडातून २५ बोटी घेतल्या जाणार आहेत. अशा प्रकारे महिन्याअखेरीस ८० बोटी जिल्हा प्रशासनाच्या ताफ्यात असतील, असेही मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले. पुरातील लोकांना स्थलांतरित करण्यासाठी २८० सुरक्षित स्थळे निश्चित केल्याचेही त्यांनी सांगितले.
अलमट्टीसाठी दोन्ही राज्यांच्या उच्चस्तरीय समितीची बैठक
वडनेरे समितीने महापुराबाबत अलमट्टी धरणाकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप होत असल्याबाबत विचारले असता मंत्री वडेट्टीवार म्हणाले, अलमट्टी धरणाच्या अलीकडे दोन ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात अडवले आहे. यावर मार्ग कारण्यासाठी दोन्ही राज्यांतील उच्चस्तरीय समितीची बैठक आवश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घ्यावी, असे पत्र दिल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.
महापुरात आणि कोरोनामध्ये प्रशासनाची चोख कामिगरी
मंत्री वडेट्टीवार यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, जिल्हा आणि महापालिका प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, गतवर्षी आलेल्या महापुरात तसेच कोरोनामध्ये लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासनाने चोख कामगिरी केली असून ो अभिनंदनास पात्र आहेत. येणाऱ्या काळात कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्याचे नियोजन आहे.
४१ कोटींची मदत आठ दिवसांत
महापुरामध्ये २९० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. अनेकांना घर, शेतीची नुकसान भरपाई मिळालेली नाही. जिल्हा प्रशासनाने ४१ कोटी तत्काळ मिळावेत असा प्रस्ताव दिला आहे. वित्त विभागाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव गेला असून मंजुरी मिळताच तत्काळ रक्कम वर्ग केली जाणार असल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.