सरनाईकांच्या आडून सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा डाव : हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 13:58 IST2021-06-21T13:56:13+5:302021-06-21T13:58:50+5:30
Politics ShivSena HasanMusrif Kolhapur : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्राच्या आडून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक भाजपच्या अशा धमक्यांना घाबरणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

सरनाईकांच्या आडून सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा डाव : हसन मुश्रीफ
कोल्हापूर : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्राच्या आडून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक भाजपच्या अशा धमक्यांना घाबरणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, प्रताप सरनाईक पुर्वी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये असल्याने ते आपले चांगले मित्र आहेत. विधीमंडळात अर्णव गोस्वामी व कंगना राणावत यांच्याविरोधात त्यांनी हक्कभंग आणल्यानंतर भाजपने त्यांच्या मागे चौकशीचा सिसेमिरा लावला आहे. आता मंत्री अनिल परब, आमदार रविंद्र वायकर यांच्या मागेही केंद्रीय तपास यंत्रणा लावल्याने सरनाईक यांनी हे वक्तव्य केल्याचे दिसते.
शिवसेनेला मोठ्या मनाने सांभाळून घेतलं
दोन्ही कॉग्रेस शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना फोडत असल्याचा आरोप चुकीचा आहे. राज्यात एक-दोन ठिकाणी असे झाले असेल, मात्र कोल्हापूरात जिल्हा परिषदेच्या सत्तेत दहा सदस्य असतानाही तीन सभापती पदे शिवसेनेला दिली. गोकुळमध्ये सहा जागा दिल्या, हेही लक्षात ठेवले पाहिजे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
ओबीसी आरक्षणावर फेरयाचिका
ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकार फेरयाचिका दाखल करणार आहे. सोेळा जिल्ह्यात ५० टक्के पेक्षा अधिक आरक्षण जाते, तिथे अडचण असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
तर जनता माफ करणार नाही
विधानसभा निवडणूकीत शरद पवार यांनी मोठ्या हिमतीने आपले आमदार निवडून आणले. उध्दव ठाकरे यांची इच्छा नसतानाही सोनिया गांधी यांच्या आशिर्वादाने मुख्यमंत्री पदी बसवले. आता कोणी वेगळा विचार करत असेल तर महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही, असा इशारा मुश्रीफ यांनी दिला.