महाडिकांचे सहकार्य घेण्याबाबत भाजप संभ्रमात--पालकमंत्र्यांची सावध भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 14:14 IST2019-05-24T14:10:48+5:302019-05-24T14:14:34+5:30
राजकारणातील वाऱ्याची दिशा पाहून भूमिका ठरविणाºया महादेवराव महाडिक यांची मदत विधानसभेच्या निवडणुकीत घ्यायची की नाही, याबाबत भाजप संभ्रमास्थेत असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. लोकसभेच्या निवडणूक निकालांचे विश्लेषण केल्यानंतरच महाडिक यांची मदत घ्यायची की नाही, हे ठरवावे लागेल.

महाडिकांचे सहकार्य घेण्याबाबत भाजप संभ्रमात--पालकमंत्र्यांची सावध भूमिका
कोल्हापूर : राजकारणातील वाऱ्याची दिशा पाहून भूमिका ठरविणाºया महादेवराव महाडिक यांची मदत विधानसभेच्या निवडणुकीत घ्यायची की नाही, याबाबत भाजप संभ्रमास्थेत असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. लोकसभेच्या निवडणूक निकालांचे विश्लेषण केल्यानंतरच महाडिक यांची मदत घ्यायची की नाही, हे ठरवावे लागेल. आताच त्याबाबत भूमिका सांगता येणार नाही, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप आणि महादेवराव महाडिक यांचे गेल्या पाच वर्षांतील राजकीय संबंध अतिशय चांगले होते. महाडिक यांच्या साथीनेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच अन्य नगरपालिका निवडणुका लढविल्या. त्यात त्यांना बरेच यशही मिळाले होते. जिल्हा परिषदेत भाजपने अध्यक्षपद मिळविले. महापालिकेतही बरेच नगरसेवक निवडून आणले. त्यामुळे सुरुवातीला मंत्री पाटील यांचा धनंजय महाडिक यांनाच छुपा पाठिंबा असल्याचा संशय व्यक्त केला जात होता; परंतु हा संशय खोटा होता, हे निकालावरून स्पष्ट झाले.
हाच संदर्भ घेऊन पालकमंत्री पाटील यांना प्रश्न विचारून बोलते करण्यात आले. ज्या महाडिकांना कोल्हापूरच्या जनतेने नाकारले आहे, त्यांना सोबत घेऊन विधानसभेची तयारी करणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा मंत्री पाटील यांनी सावध उत्तर दिले. महाडिक गटाशी आमचे संबंध होते आणि यापुढेही राहतील; पण राजकीयदृष्ट्या संबंध ठेवायचे की नाही, हे आत्ताच सांगता येणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण करावे लागेल. शिवाय मी एकटा ठरविणार नसल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशीही याबाबत चर्चा करावी लागेल.
शेट्टींना उद्धटपणा नडला : पालकमंत्री
राजू शेट्टी यांचा पराभव होणारच होता; कारण ज्यांनी शेतकऱ्यांची आणि शेतकरी चळवळीची वाट लावली, त्या कॉँग्रेस-राष्टवादीशी मांडीला मांडी लावून बसण्याची शेट्टी यांची भूमिका शेतकºयांना आवडली नाही. भाजपबरोबरची साथ जर शेट्टी यांनी सोडली नसती, तर कदाचित विरोधाची धार थोडी कमी झाली असती. त्यांना त्यांचा उद्धटपणा, प्रत्येकाचा अपमान करण्याची त्यांची वृत्ती नडली, असे मंत्री पाटील म्हणाले.