बेळगाव येथे कारची ट्रकला धडक; औरंगाबादचे सात तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:41 IST2019-06-03T00:41:30+5:302019-06-03T00:41:35+5:30
बेळगाव : भरधाव कारचा टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून कार व ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात औरंगाबादचे सात तरुण ...

बेळगाव येथे कारची ट्रकला धडक; औरंगाबादचे सात तरुण ठार
बेळगाव : भरधाव कारचा टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून कार व ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात औरंगाबादचे सात तरुण ठार झाले. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास बेळगाव शहराजवळील महामार्गावर, श्रीनगर गार्डनजवळ हा अपघात घडला. हे सर्व तरुण गोव्याकडे जात होते.
नंदू किशनराव पवार (वय २८), अमोल निले (२६), सुरेश कन्हेरे (२९), अमोल रमेश चावरे (२६), महेश चावरे (२८), महेश नंदू कडाले, गोपीनाथ कडोबा वरकड (वय २७) (सर्वजण रा. औरंगाबाद) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.
ट्रकने जोराची धडक दिल्याने कारचा चक्काचूर झाला होता. कारमधील पाच तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. गंभीर जखमी अवस्थेत महेश कडाले व गोपीनाथ वरकड या दोघांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना या दोघांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.
औरंगाबादहून कारमधून सात तरुण गोव्याकडे निघाले होते. रविवारी सकाळी या सर्वांनी कोल्हापूर येथे अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर हे सर्वजण बेळगावमार्गे गोव्याला जात होते. त्यांची कार बेळगाव येथील श्रीनगर गार्डनजवळ आली तेव्हा कारचा समोरील टायर फुटला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ती दुभाजकावरून पलीकडील रस्त्यावर गेली. यावेळी धारवाडहून कोल्हापूरकडे निघालेल्या ट्रकला कारची जोरदार धडक बसली. ही धडक भीषण असल्याने कारमधील पाच जण जागीच ठार झाले. तर दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्या दोघांचाही ही मृत्यू झाला.