लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरात १२ दिवसांपासून दि मँचेस्टर ट्रक मोटार मालक संघाच्यावतीने भाडेवाढसाठी सुरू असलेले कामबंद आंदोलन अखेर आमदार प्रकाश आवाडे यांच्या पुढाकाराने मागे घेण्यात आले. त्यामुळे पुन्हा वाहतूक पूर्ववत होणार आहे. यावेळी कापडाची गाठी ७५ किलोपेक्षा कमी वजनाची असावीत, असा निर्णय घेण्यात आला.
इचलकरंजीतून अहमदाबाद, जोधपूर, पाली-बालोत्रा या ठिकाणी कापड गाठी घेऊन जाणाऱ्या गाड्यांना भाडेवाढ मिळावी, यासाठी दि मँचेस्टर संघाने १९ जुलैपासून वाहतूक बंद केली. यासंदर्भात दि मँचेस्टर ट्रक मोटार मालक संघ व दि इचलकरंजी गुड्स ट्रान्स्पोर्ट वेअर हाऊस व लॉरी ऑपरेटर्स असोशिएशनमध्ये बैठक झाली. मात्र, योग्य तोडगा निघाला नाही. आमदार आवाडे यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. यामध्ये आवाडे यांनी चर्चेअंती समन्वय साधत वाहतूक पूर्ववत करण्याचा तोडगा काढला. यावेळी प्रकाश दत्तवाडे, अशोक शिंदे, संस्थापक राजाराम जगताप, जितेंद्र जानवेकर, संजय अवलक्की, आनंदराव नेमिष्टे, अभिजित ताटे, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
२९०७२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजीतील कापड वाहतूकदारांनी कामबंद आंदोलन मागे घेतले.