बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 00:04 IST2026-04-14T00:03:17+5:302026-04-14T00:04:56+5:30
पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि आशा भोसले यांनी येथे नव्याने सुरू झालेल्या महाविद्यालयाच्या मदतीसाठी ‘नक्षत्रांचे देणे’ हा कार्यक्रम विनामोबदला केला होता.

बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम
-राम मगदूम, गडहिंग्लज
प्रसिद्धीच्या झोतात असतानाही केवळ बालमैत्रिणीच्या प्रेमापोटी लोकप्रिय मराठी पार्श्वगायिका आशा भोसले स्वखर्चाने गडहिंग्लजला आल्या होत्या. पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि आशा भोसले यांनी येथे नव्याने सुरू झालेल्या महाविद्यालयाच्या मदतीसाठी ‘नक्षत्रांचे देणे’ हा कार्यक्रम विनामोबदला केला होता. आशाताईंच्या निधनानंतर गडहिंग्लजकरांनी ती आठवण जागवली.
येथील माजी नगराध्यक्ष दिवंगत जनार्दन तथा ज. रा. पेडणेकर यांच्या पत्नी केशर तथा सुधाताई व आशाताई ह्या दोघी बालमैत्रिणी होत्या. कोल्हापूरातील वास्तव्यास मंगळवार पेठेतील सुधाताईंचे मामा सूर्यकांत व रवींद्र कारेकर यांच्या घराच्या माडीवर आशाताई भाड्याने राहत होत्या. त्यावेळी जुळलेल्या मैत्रीपोटीच त्या दोनवेळा आवर्जून गडहिंग्लजला आल्या होत्या.
१९९७ मध्ये सुधाताईंचे सुपूत्र तत्कालीन नगराध्यक्ष राजन पेडणेकर यांनी प्रियदर्शिनी महिला सहकारी बँकेची स्थापना केली. त्याच्या उद्घाटनाचे निमंत्रण द्यायला गेल्यानंतर आशाताईंनी घातलेल्या ‘अटी’ची त्यांनी पूर्तता केली. म्हणूनच, त्या गडहिंग्लजला आल्या होत्या.
१९९८ मध्ये राजन पेडणेकर यांनी ओंकार शिक्षण प्रसारक मंडळातर्फे सुरू केलेल्या महाविद्यालयाच्या मदतीसाठी पंडीत हृदयनाथ मंगेशकर आणि आशाताई यांनी ‘नक्षत्रांचे देणे’ हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम येथे सादर केला. तिकीटाच्या विक्रीतून जमलेली रक्कम त्यांनी महाविद्यालयाला दिली. त्या कार्यक्रमात आशाताईंनीही स्वत: काही भावगीते सादर केली होती.
...अन् कारगाडी गडहिंग्लजला आली!
पाचगणीहून गडहिंग्लजला आशाताई महिला बँकेच्या उद्घाटनला येणार होत्या. त्यांना आणण्यासाठी राजन यांची बहिण सुरेखा साताऱ्याला कारगाडी घेवून गेल्या होत्या. आशाताई गाडीत बसल्यानंतर डिझेल टाकण्यासाठी गाडी पंपावर गेली. सुरेखांनी डिझेलचे पैसे देताच आशाताई म्हणाल्या, 'मला मुंबईला सोडा'. त्यानंतर डिझेलचे पैसे सुरेखांनी स्विकारल्यानंतरच कारगाडी गडहिंग्लजला आली.
सुधाताईंना मारली मिठी
बँकेच्या उद्घाटनाचे निमंत्रण द्यायला गेल्यानंतर बालमैत्रिण केशर तथा सुधाताई यांना मुंबईला आणण्याची अट राजन यांना घातली होती. त्यानुसार आईला घेवून राजन मुंबईला गेले. आर.डी.बर्मन यांच्या बंगल्यावर भेट होताच त्यांनी सुधाताईंना मिठी मारली. त्यानंतर त्यांना आपल्या ‘प्रभुकुंज’ बंगल्यावर नेवून स्वत:च्या हाताने स्वयंपाक करून वाढले. उच्चस्थानावर पोहचल्यानंतरही आशाताईंचे राहणे-वागणे साधे होते, ‘नाती-गोती’ही त्यांनी जीवापाड जपली होती.