पुन्हा वीस तारीख!

By Admin | Updated: February 21, 2015 23:45 IST2015-02-21T23:26:50+5:302015-02-21T23:45:38+5:30

अवघा सातारा अस्वस्थ : गोविंद पानसरे यांच्या निधनाने सर्वसामान्य हळहळला

Again 20th date! | पुन्हा वीस तारीख!

पुन्हा वीस तारीख!

सातारा : पुणे येथे अज्ञात हल्लेखोरांनी २० आॅगस्ट २०१३ रोजी सकाळी फिरायला गेलेले डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध अद्याप पोलिसांना लागलेला नाही. त्यातच पुरोगामी विचारांचे ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी फिरायला गेलेले असतानाच ‘तुम्हीच का पानसरे?’ असे विचारून त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यांची पाच दिवसांपासून मृत्यूशी असलेली झुंज अखेर शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजता संपली. सोशल मीडियावर हे वृत्त समजातच अवघा सातारा जिल्हा पुन्हा एकदा अस्वस्थ झाला. एका लढवय्या नेत्याच्या संघर्षाची ही अखेर सर्वसामान्यांच्या जिवाला चटका लावून गेलीच; पण २० तारखेचा हा दुर्दैवी योगायोग सातारकरांच्या मनात पुन्हा दाभोलकरांच्या स्मृती जागवून गेला.
सोशल मीडिया म्हणतो...
८२ वर्षांच्या वृद्धाला मारणाऱ्यांनो, संपला जरी देह तरी संपणार नाही मती. धर्माच्या गारद्यांनो कशी रोखणार गती?
कितीही आवळले सत्याच्या गळी कासरे, धर्मांध दहशती हसतील किती असुर हासरे, रोखण्या अन्याय जुलूम विखारी झुंजतील श्वास रे, जन्मतील पदोपदी दाभोळकर अन् पानसरे
दाभोलकर झाले, आता गेले पानसरे, कोण उरले मग सामान्यांना पुसणारे, नेहमी जर असेच वाईट असेल घडणार तर, सांगा समाजासाठी कोण झगडणार?
परिवर्तनाच्या चळवळीत काम करायला भिणारी माणसं जिवंतपणी मेलेली असतात, तर चळवळीत काम करणारी माणसं मेल्यानंतरही जिवंत राहतात
कष्टकऱ्यांना न्याय दिला तुम्ही, खरा शिवराय सांगून गेला तुम्ही, चालू तुमच्याच वाटेवर आम्ही, हीच श्रद्धांजली वाहतो आम्ही
विचारांचा पराभव हे पचवू नाही शकले, म्हणूनच विचारांच्या लढाईत बंदुकीवर येऊन ठेपले!
फलक घेऊन दाभोळकर वा पानसरे होण्यापेक्षा त्यांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जागरुक, कृतिशील नागरिक होऊन अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी पुढाकार घेऊ शकलो तरच खऱ्या अर्थाने फलकांशिवाय आपण पानसरे होऊ शकतो.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर ‘अंनिस’ची घडी विस्कटेल असे वाटत होते, मात्र तसे न घडता समितीचे कार्य जास्त जोमाने सुरू आहे. माणसाला मारले म्हणजे त्याचे विचार संपविता येत नाहीत, हेच यातून सिद्ध होत आहे. तसेच कॉम्रेड पानसरे यांनी गोरगरीब कष्टकरी, कामगारांसाठी लढा दिला. हल्लेखोरांनी त्यांना मारले; पण त्यांचे विचार कधीही संपणार नाहीत.
महिला, विद्यार्थिनींचा निषेध मोर्चा
सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय व जिल्हा महिला लोक आयोग शाखेच्या वतीने सातारा सकाळी दहा वाजता शहरातून मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. कॉ. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत मोर्चात सहभागी विद्यार्थिनी व महिलांनी निषेध व्यक्त केला. महाविद्यालयापासून हा मोर्चा पोवई नाक्यावरून राजवाडामार्गे काढण्यात आला. मोर्चात सहभागी महिला व विद्यार्थिनींनी घोषणाबाजी केली. पुरोगामी विचारांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना पकडून त्यांना कठोर शासन द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आज सर्वपक्षीय सातारा बंद
सातारा : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीने रविवार, दि. २२ रोजी जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. कार्यकर्त्यांनी शनिवारी शहरातून फेरी मारून दुकानदारांना बंदची पत्रके वाटून या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. पानसरे यांच्या खुन्यांचा शोध लवकरात लवकर लावावा, पुरोगामी विचारवंतांच्या खुनाचे सत्र सुरू आहे, ते ताबडतोब थांबविण्याच्या दृष्टीने शासनाने कडक पावले उचलावीत, यासाठी जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. येत्या काळात अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून सर्व जनतेने या लढाईत सामील होण्याची वेळ आली आहे. जाती धर्माच्या नावावर, समाजात दुही माजवून लोकांना धमकावून चळवळ थांबविण्याचे प्रयत्न केले असल्याने हे आवाहन करण्यात आले आहे. या बद्दल सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे.
हा तर परिवर्तनवादी चळवळीवरील हल्ला
परिवर्तन चळवळीतील ज्येष्ठ नेते कॉ. गोविंदराव पानसरे यांच्यावर झालेला हल्ला हा परिवर्तनवादी चळवळीवर झालेला हल्ला आहे. बंदुकीच्या गोळीने विचार संपविण्याचे सत्र डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनापासून सुरू झाले असून कॉ. पानसरे यांच्या खुनाचा प्रकार याच सत्राचा एक भाग असण्याची शक्यता आहे, त्यामुळे जिल्ह्यातील परिवर्तनवादी विचारवंतांना योग्य संरक्षण द्यावे, अशी मागणी बामसेफ, मूलनिवासीतर्फे करण्यात आली आहे
पत्रकात म्हटले आहे की, डॉ. दाभोळकरांच्या खुनाला दीड वर्षे उलटूनही अद्याप पोलिसांना त्यांच्या मारेकऱ्यांना अटक करता आलेली नाही. त्यातच कॉ. पानसरेंचीही अशाच पद्धतीने हत्या झाल्याने परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही विचारवंतांच्या मारेकऱ्यांना, त्यामागील सूत्रधारांना त्वरित अटक व्हावी, अशी मागणीही बामसेफचे संघटक कैलास तोरणे व मूलनिवासी संघाचे जिल्हाध्यक्ष पी. व्ही. तुपे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

Web Title: Again 20th date!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.