खराब रस्त्यांबाबत ठेकेदारावर कारवाई, सोमवारपासून होणार पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:24 IST2021-07-30T04:24:56+5:302021-07-30T04:24:56+5:30

कोल्हापूर : दायित्व कालावधीतील रस्ते खराब झाले असतील तर संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही गुरुवारी महानगरपालिका अतिरिक्त ...

Action will be taken against the contractor regarding bad roads, panchnama will be held from Monday | खराब रस्त्यांबाबत ठेकेदारावर कारवाई, सोमवारपासून होणार पंचनामे

खराब रस्त्यांबाबत ठेकेदारावर कारवाई, सोमवारपासून होणार पंचनामे

कोल्हापूर : दायित्व कालावधीतील रस्ते खराब झाले असतील तर संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही गुरुवारी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी ई-वॉर्ड लोककल्याण व संघर्ष समितीच्या शिष्टमंडळास दिले. शहरातील खराब रस्त्यांचे सोमवारपासून पंचनामे करण्याचा तसेच त्याची सुरुवात राजारामपुरीतून करण्याचा शब्दही त्यांनी दिला.

संघर्ष समितीचे शिष्टमंडळ गुरुवारी महापालिका अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी शहरातील खराब रस्त्यांबाबत शिष्टमंडळाने प्रशासनाचे लक्ष वेधले. शिष्टमंडळात ॲड. बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, अनिल कदम, अनिल घाडगे, किशोर घाडगे, महादेव पाटील, श्रीकांत भोसले, किशोर माने, अमर निंबाळकर यांचा समावेश होता.

शहरातील ७५० किलोमीटर रस्त्यापैकी ३०० रस्ते आजही चांगले आहेत, बाकीचे रस्ते खराब झाले आहेत. याचाच अर्थ जे रस्ते खराब झाले ते मुळातच निकृष्ट दर्जाचे होते. आयआरबी रस्त्यांची दर पाच वर्षांनी दुरुस्ती होणे अपेक्षित असताना ती झाली नाही. तसेच आयआरबीने केलेल्या रस्त्याकडेच्या गटारी गेल्या दहा वर्षांत स्वच्छ केलेली नाहीत. त्यामुळे त्यातून तुंबणारे पाणी रस्त्यावर येते आणि रस्ते खराब होतात, असे बाबा इंदूलकर यांनी सांगितले.

मागच्या दोन वर्षांत नव्याने केलेल्या रस्त्यांची तपासणी स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी व्हावी, दायित्व कालावधीतील खराब रस्ते ठेकेदाराकडून दुरुस्त करून घ्यावेत, या कामाच्या तपासणीत शास्त्रीयदृष्ट्या तफावत आढळल्यास संबंधित ठेकेदारावरही फौजदारी गुन्हा दाखल करावा, आयआरबी रस्त्यांची दुरुस्ती, साफसफाई करून घ्यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या मागण्यांबाबत येत्या आठ दिवसांत प्रशासनाकडून कार्यवाही झाली नाही तर दि. ९ ऑगस्ट क्रांतिदिनी महापालिकेसमोर खड्ड्यात बसून आंदोलन करण्याचा तसेच १४ ऑगस्ट रोजी शहर अभियंता यांना रिक्षात बसवून शहरातील खड्ड्यांचे दर्शन घडविणार असल्याचा इशाराही संघर्ष समितीतर्फे देण्यात आला.

फोटो क्रमांक - २९०७२०२१-कोल-रोड मिटींग

ओळ - कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांबाबत ई-वॉर्ड लोककल्याण व संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्याशी चर्चा केली.

Web Title: Action will be taken against the contractor regarding bad roads, panchnama will be held from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.