आजरा : आजरा शिवाजीनगरमधील अजित देसाई कुटुंबीय मुलगा अभिषेकचे लग्न ठरले म्हणून आनंदात होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. अभिषेक अजित देसाई (वय ३१) या तरुणाचा गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज सकाळी मृत्यू झाला. पंधरा दिवसांपूर्वी लग्न ठरले व दिवाळीत चांगल्या पध्दतीने लग्न करण्याचा दोन्ही कुटुंबियांनी निर्धार केला. पण बोहल्यावर चढण्यापूर्वीच अभिषेकचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.अजित देसाई हे वाटंगी येथील विकास सेवा संस्थेत सचिव म्हणून काम करतात. मोठा मुलगा बारामती येथे नोकरीस आहे. तर अभिषेक हा वाणिज्य शाखेतील पदवीधर असल्याने गोव्यातील खासगी कंपनीत नोकरीस होता. त्याची होणारी पत्नीही गोव्यातीलच कंपनीत नोकरीस आहे. पंधरा दिवसांपूर्वी या दोघांचा विवाह ठरला होता. दिवाळीत लग्न करण्याचे निश्चीत झाले होते. लग्न ठरल्यामुळे दोन्ही कुटूंबिय आनंदात होती. काल अभिषेकला सर्दी झाली होती. सर्दी तापाची गोळी घेऊन तो झोपला. पण झोप लागली नसावी. त्याच्या छातीत दुखत असल्याने पहाटे ६.३० वाजता अभिषेकने आपल्या होणाऱ्या पत्नीला फोनवरुन याची कल्पना दिली. तातडीने त्यांचे कुटुंबिय अभिषेक राहत असलेल्या ठिकाणी पोहोचले. पण आतून दरवाजा बंद होता. आवाज दिला तरीही अभिषेकने दार न उघडल्याने सर्वांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. घरमालकाने पोलिसांना बोलावून दार मोडून आतमध्ये प्रवेश केला. तर समोरचे दृश्य विचित्रच होते. अभिषेकला रक्ताची उलटी झाली होती व त्याच ठिकाणी तो निपचीत पडला होता.बोहल्यावर चढण्यापूर्वीच अभिषेकचा झालेला मृत्यू सर्वांना चटका लावून गेला. अभिषेकला पाहून आई-वडिलांनी फोडलेला हंबरडा सर्वांच्या डोळ्यांच्या कडा ओलावून गेल्या. सायंकाळी अभिषेकवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, भावजयी असा परिवार आहे.
Kolhapur: पंधरा दिवसांपूर्वी ठरले लग्न, बोहल्यावर चढण्यापूर्वीच आजऱ्यातील तरुणाचा गोव्यात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 19:12 IST