‘अर्धा ग्लास’च्या उपक्रमातून ४० टक्के पाणीबचत
By Admin | Updated: May 12, 2016 00:54 IST2016-05-12T00:42:02+5:302016-05-12T00:54:22+5:30
हॉटेलमालक संघाचा पुढाकार : सकारात्मक पाऊल, ग्राहकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद

‘अर्धा ग्लास’च्या उपक्रमातून ४० टक्के पाणीबचत
भीमगोंडा देसाई --कोल्हापूर --दुष्काळामुळे पाणीबचतीसाठी येथील हॉटेलमालक संघाने पुढाकार घेतला आहे. दीड महिन्यापासून अर्धा ग्लास पाणी उपक्रम, वॉश बेसिन, हॅँडवॉशवरील अमर्याद पाणी वापरावर निर्बंध आणण,े अशा उपाययोजनांची अंमलबजावणी पाणीबचत जागृतीच्या माध्यमातून संघ करीत आहे. यामुळे पूर्वीपेक्षा सरासरी ४० टक्के पाण्याची बचत झाली आहे. पाणीबचतीसाठी हॉटेलमालकांनी स्वत:हून टाकलेल्या सकारात्मक पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने तलाव, विहिरी, कूपनलिका यांच्यातील पाण्याने तळ गाठला आहे. भूगर्भातील पाणी खालावल्याने नव्याने खोदण्यात आलेल्या कूपनलिकांनाही पाणी लागत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे असलेले पाणी जपून वापरणे हा एकमेव मार्ग सध्या उपलब्ध आहे. यामुळेच जिल्हा प्रशासनाने मोठी धरणे, लघुपाटबंधारे प्रकल्प यांच्यातील पाणी पिण्यासाठी १५ जूनपर्यंत पुरेल असे नियोजन केले आहे. उपसाबंदी करून शेतीच्या पाणी वापरात कपात केली आहे. उद्योजकांचे २५ टक्के पाणी कपात केले आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे. संघटनाही प्रयत्न करीत आहेत.
कोल्हापूर शहरातही एक दिवसआड पाणी पुरविले जात आहे. पाऊस लांबल्यास टंचाईच्या झळा तीव्र होणार आहेत. त्यामुळे हॉटेलमालक संघाने शक्य तिथे पाणी बचत करण्याचा निर्णय घेतला. सर्वसाधारण सभेत पाणीबचतीचा विषय ठेवून सर्वांनुमते ठराव केला. दीड महिन्यापासून शहरातील हॉटेलमध्ये पाणीबचतीचे उपक्रम राबविले जात आहेत. हॉटेलमध्ये प्रत्येक ग्राहकास पाण्याचा ग्लास भरून देण्याऐवजी एकाच ठिकाणी तांब्या ठेवून त्यावर वाटी ठेवणे किंवा अर्धा ग्लास भरून देण्याला सुरुवात केली आहे. एखाद्या ग्राहकाची तहान अर्ध्या ग्लासने न शमल्यास पुन्हा पाणी घेण्यासाठी जवळच व्यवस्था केली आहे.
ग्राहकांकडूनही त्याला सहकार्य मिळत आहे. हात व भांडी धुण्यासाठीच्या वॉश बेसिनच्या नळाचे पाणी कमी दाबाने सोडणे, असे केले जात आहे. ‘पाणी जपून वापरा’ असे संदेश लिहिलेली स्टिकर्स लावली आहेत. ग्लासमधील पिऊन राखलेले पाणी एकत्र करून हॉटेलमधील फरशी स्वच्छ करण्यासाठी ते वापरले जात आहे.
ं‘लोकमत’मुळे चालना
दुष्काळामुळे पाणीबचतीचे महत्त्व सांगण्यासाठी ‘लोकमत’तर्फे राज्यभर ‘जलमित्र’ हे अभियान राबविले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही या अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी (दि. ९) हॉटेलमालक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ कार्यालयास भेट देऊन ‘जलमित्र अभियाना’त सहभाग घेणार असल्याचे सांगितले. हॉटेलमधील पाणीबचतीच्या उपक्रमास ‘लोकमत’मुळे चालना मिळाली, असे हॉटेलमालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर यांनी सांगितले.
जिल्ह्यात १२०० हॉटेल
कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम आणि मोठी अशी १२०० हॉटेल्स आहेत. यांपैकी ६०० शहरातील आहेत. सर्व हॉटेलपर्यंत विविध माध्यमांतून पाणी बचतीचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न संघाने केला आहे.
पाणी बचतीसाठी विविध उपक्रम राबवित आहोत. त्यास हॉटेलमालक आणि ग्राहकांकडूनही चांगले सहकार्य मिळत आहे. संघातर्फे राबवित असलेल्या उपक्रमांमुळे सरासरी ४० टक्के पाणी बचत झाली आहे.
- उज्ज्वल नागेशकर,
अध्यक्ष, हॉटेलमालक संघ