कोल्हापूर : गेल्या वर्षापासून घरफाळा घोटाळा करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करूनही महापालिका प्रशासनाकडून कोणत्याच हालचाली होताना दिसून येत नाहीत. १५ दिवसांमध्ये कारवाई झाली नाही, तर जनआंदोलन केले जाईल, असा इशारा शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्यावतीने मंगळवारी महापालिका अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना निवेदनाद्वारे दिला आहे. घरफाळ्याची २५४ कोटी रुपयांची थकबाकी जाहीर करण्यात आली असून, ती कधीपासूनची आहे. गेल्या कित्येक वर्षात घरफाळा विभागाचे ऑडिट का झालेले नाही. थकबाकीस कोण कोण अधिकारी जबाबदार आहेत, या कालावधीतील ऑडिटर कोण आहेत, असा सवाल करत त्यांची नावे जाहीर करावीत, अशी मागणी करण्यात आली. सध्याची घरफाळा आकारणी संगणक प्रणाली चुकीची, बोगस आहे ती बंद करून नवीन संगणक प्रणाली अंमलात आणण्याची मागणीही केली. यावेळी अशोक पोवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, अंजुम देसाई, चंद्रकांत सूर्यवंशी, संभाजीराव जगदाळे आदी उपस्थित होते.
.