‘केडीएमसी’तील स्मशानांतला ‘काळोख’ संपणार तरी कधी?
By मुरलीधर भवार | Updated: March 2, 2026 07:41 IST2026-03-02T07:40:50+5:302026-03-02T07:41:06+5:30
स्मार्ट सिटी प्रकल्पात स्टेशन परिसर विकास, सीसीटीव्ही यंत्रणा, स्मार्ट रस्ते, पार्किंग प्लाझा आदी गोष्टींवर १ हजार ६८ कोटींचा खर्च केला आहे.

‘केडीएमसी’तील स्मशानांतला ‘काळोख’ संपणार तरी कधी?
- मुरलीधर भवार
प्रतिनिधी
कल्याण-डोंबिवली महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्प राबवीत आहे. त्याचाच महत्त्वाचा भाग म्हणून प्रत्येक प्रभागातील अंधाऱ्या जागा, रस्ते आणि चौक लखलखीत केले जात आहेत. सोलार दिव्यांचा वापर केला जात आहे. मात्र, महापालिका हद्दीतील अनेक स्मशानभूमींत काळोखाचे साम्राज्य आहे. पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळींवर मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते. स्मार्ट सिटी प्रकल्प राबवणाऱ्या महापालिकेने याची गांभीर्याने दखल दखल घेण्याची गरज आहे. अन्यथा स्मार्ट सिटी म्हणजे केवळ गप्पाच ठरू शकतात.
स्मार्ट सिटी प्रकल्पात स्टेशन परिसर विकास, सीसीटीव्ही यंत्रणा, स्मार्ट रस्ते, पार्किंग प्लाझा आदी गोष्टींवर १ हजार ६८ कोटींचा खर्च केला आहे. स्मार्ट सिटीत स्मशानभूमींचा विचार केला गेला आहे का, असा प्रश्न पडतो. नुकताच एक प्रकार उजेडात आला. कल्याण पूर्वेतील एका स्मशानभूमीत प्रकाश व्यवस्था नसल्याने मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागले. ही बाब ‘लाेकमत’ने प्रकाशात आणताच तेथे दिवाबत्तीची सोय करण्यात आली; पण प्रत्येकवेळी बातमी प्रसिद्ध करण्याची वाट पालिका प्रशासन पाहणार का? यापूर्वीही उंबर्डे-सापर्डे परिसरात दुचाकीच्या हेडलाइटच्या प्रकाशात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नातेवाइकांवर आली होती. त्याची वाच्यता झाल्यावर प्रशासनाला जाग आली होती.
महापालिका क्षेत्रात ६९ स्मशानभूमी
महापालिका कार्यक्षेत्रात ६९ स्मशानभूमी आहेत. त्यापैकी ४३ स्मशानभूमी डोंबिवलीत, तर उर्वरित कल्याणमध्ये आहेत. स्मशानभूमींची संख्या मोठी आहे. महापालिकेत २०१५ मध्ये २७ गावे समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे स्मशानभूमींची संख्या वाढली.
२७ गावांतील स्मशानभूमीचा देखभाल-दुरुस्तीचे काम २०१५ पूर्वी ग्रामपंचायतींकडे होते. आता ते महापालिकेच्या हाती आहे. त्यामुळे सगळ्याच स्मशानभूमींची देखभाल-दुरुस्ती एकाच वेळी हाती घेणे प्रशासनाला शक्य नसल्याचे सांगितले जाते.
आता महापालिकेने कल्याणमधील ४ आणि डोंबिवलीतील ३ स्मशानभूमींच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यावर २० कोटी खर्च केले जात आहेत. चार वर्षांपूर्वी कांचनगाव स्मशानभूमीच्या जागेवर इमारत उभारली गेली. बिल्डरने अत्याधुनिक सोयीसुविधांची स्मशानभूमी विकसित करून दिली. असा कोणी पुढाकार घेतल्यास त्याला कोणाची हरकत नसेल.
महापालिका हद्दीतील स्मशानभूमी प्रकाशमान राहाव्यात त्यासाठी पालिकेने २२ ठिकाणी हायब्रीड सोलार फिटिंग बसविण्याचे काम हाती घेतले आहे.