कल्याणसह नजीकच्या भागात बत्ती गुल; पूरस्थितीमुळे १७ हजाराहून अधिक नागरिकांचा वीजपुरवठा बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 19:05 IST2021-07-22T19:05:12+5:302021-07-22T19:05:28+5:30
मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका

कल्याणसह नजीकच्या भागात बत्ती गुल; पूरस्थितीमुळे १७ हजाराहून अधिक नागरिकांचा वीजपुरवठा बंद
कल्याण: संततधार पावसामुळे पाणी साचल्याने कल्याण मंडल एक कार्यालयांतर्गत जवळपास १७ हजार ८०० ग्राहकांचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागला होता. बारावे येथून निघणारा मुरबाड रोड फिडर हा प्रेम ऑटो सर्कल, शहाड, योगीधाम, घोलप नगर भागात पाणी साचल्याने या परिसरातील ८० रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बंद करण्यात आले. तेजश्री येथून निघणारा पौर्णिमा फिडरवरील पौर्णिमा सर्कल भागातील ९ रोहित्र बंद ठेवण्यात आले. मोहने फिडरवरील २० रोहित्र बंद ठेवण्यात आले.
कल्याण मंडल कार्यालय दोन अंतर्गत सरळगाव फिडरवरील ४० रोहित्र बंद ठेवण्यात आली असून परिसरातील १९ गावे आणि ५३०० ग्राहकांचा वीजपुरवठा बाधीत झाला आहे. शहापूर फिडरवरील २० रोहित्र बंद ठेवण्यात आली असून ११ गावे व १८०० ग्राहकांचा वीजपुरवठा बंद आहे. किन्हवली फिडरवरील ६७ रोहित्र बंद ठेवण्यात आली असून ३४ गावे व ४५०० ग्राहक बाधित झाले आहेत. कोन, पिंपळघर, म्हारळ, गोवेली, कांबा परिसरातील ६०० रोहित्र बंद असून ४० गावे व ९० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला आहे. बदलापूर पूर्व आणि पश्चिम, बाजारपेठ वांगणी येथील १३० रोहित्र बंद असून ४५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद आहे. उल्हासनगर-३, शांतीनगर, करोतिया नगर, स्मशानभूमी, भालेराव व रोकडे नगर भागातील १८ रोहित्र बंद असून ३५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद आहे.पाणी पातळी कमी होईल त्यानुसार बाधित क्षेत्राचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येत असल्याचे महावीतरणाकडून सांगण्यात आले आहे.