Kalyan: वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेमुळे वाचले २६ विद्यार्थ्यांचे प्राण
By मुरलीधर भवार | Updated: December 20, 2024 21:54 IST2024-12-20T21:53:51+5:302024-12-20T21:54:14+5:30
Kalyan News: कुर्ला येथे मद्यधुंद चालकाने बस चालविल्याने झालेल्या अपघातात अनेकांना प्राण गमावावे लागले. ही घटना ताजी असताना उल्हासनगरातून विरारला एक खाजगी बस विद्यार्थ्यांना घेऊन चालली होती.

Kalyan: वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेमुळे वाचले २६ विद्यार्थ्यांचे प्राण
- मुरलीधर भवार
कल्याण - कुर्ला येथे मद्यधुंद चालकाने बस चालविल्याने झालेल्या अपघातात अनेकांना प्राण गमावावे लागले. ही घटना ताजी असताना उल्हासनगरातून विरारला एक खाजगी बस विद्यार्थ्यांना घेऊन चालली होती. या खाजगी बसचा चालक बस वेडीवाकडी चालवित असल्याचे पोलिसाच्या लक्षात आल्याने पोलिसाने त्याला रोखले. बसचा चालक मद्यधुंद असल्याने त्यांच्या ताब्यातील बस पोलिसांनी जप्त केली. मद्यधुंद बस चालकाला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेमुळे २६ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहे. वाहतूक पोलिसांनी बजावलेल्या कर्तव्य दक्षतेचे शहरात कौतूक केले जात आहे.
आज सायंकाळी एका खाजगी बस उल्हासनगर येथील जग्गू फुटबॉल अकॅडमीतील २६ लहान मुलांना घेऊन विरारला जाण्यासाठी निघाली होती. बसमधील लहान मुले विरारच्या ग्लोबल स्कूल येथे फुटबॉल खेळण्यासाठी जाणार होती. उल्हासनगरातून निघालेली ही बस वालधूनी पूल उतरून कल्याणच्या सुभाष चौकात आली. बस चालक बस वेडीवाकडी चालवित होता. ही बाब सुभाष चौकात वाहतूक नियंत्रणाचे काम करणारे वाहतूक पोलिस सुरेश पाटील यांच्या निदर्शनास आली. तात्काळ पोलिस पाटील यांनी बसच्या चालकाला हात दाखवून ती जागीच थांबविण्यास सांगितले. बस चालकाने बस थांबविली. तेव्हा पोलिस पाटील हे बस चालकाजवळ केले. बस चालकाने मद्यसेवन केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बस चालक सुरेंद्र प्रसाद गाैतम यांची ब्रेथ अ’नालायझर टेस्ट केली. त्यातही तो मद्य प्राशन केल्याचे उघड झाले. ही बाब अतिशय गंभीर असल्याने पोलिस पाटील यांनी बस चालकाच्या ताब्यातील बस जप्त केली.
बस चालकास दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी बस चालकाला उद्या कोर्टात हजर केले जाणार आहे. त्याने दंड भरला तर त्याच्या ताब्यातील बस सोडण्यात येणार आहे अशी माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेश शीरसाट यांनी दिली आहे. वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.