कल्याण - कोरोना लसीचे दोन डोस घेणाऱ्यांना प्रवासाची मुभा दिली जाते. अशात, नागरीक लस घेण्यास तयार असताना त्याना दोन डोस उपलब्ध करून देणे, ही सरकारची जबाबदारी आहे. टी.बी., कॅन्सर आणि एड्ससारखे आजार असणारेही रुग्ण आहेत. कोरोनाकाळात संपूर्ण जग बंद करून कसे चालेल, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केला आहे. तसेच, कॅनडा, अमेरीकेतील लॉकडाऊन काळात तेथील नागरीकांच्या खात्यात पैसे जमा केले गेले. आपल्या इथेही नागरीकांच्या खात्यात पैसे टाका, अशी मागणीही, शर्मिला ठाकरे यांनी केली आहे. (It is the responsibility of the government to make two doses of the corona vaccine available to citizens says Sharmila Thackeray)
मनसेच्या डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेचे उद्घाटन शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यासह शहराध्यक्ष मनोज घरत, प्रकाश भोईर, राहूल कामत आणि महिला आघाडीच्या मंदा पाटील, आदी उपस्थित होते.
शर्मिला ठाकरे म्हणाल्या, लोक विकतची लस घेण्यास तयार आहेत. त्यांना विकतची लसही उपलब्ध करुन दिली जात नाही. जो टक्का लस विकत घेऊ शकत नाही. त्यांना मोफत लस दिली पाहिजे. ज्यांची लस विकत घेण्याची कुवत आहे. त्यांना विकत द्यावी. आपल्या देशातून जगाला लस उपलब्ध करुन दिली जाते. मात्र आपल्या देशातील नागरीकांना लस मिळत नाही. त्याची व्यवस्था पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी करावी. लोकांकडून जीएसटी, इन्कम टॅक्स विविध कर वसूल केले जातात. हा पैसा जातो कुठे, असा सवाल उपस्थित करीत नागरीकांच्या कर रुपी पैशातून तरी लस विकत घेऊन ती नागरीकांना मोफत देण्यात यावी. कोरोना काळात सामान्य सर्व सामान्य माणूस सर्व बाजूंनी गांजला असता त्याला वीजेची भरमसाठ बिले पाठविण्यात आली आहेत. विज बिले कमी करण्याचा शब्दसुद्धा सरकार पाळू शकले नाही, असा निशाणाही शर्मिला ठाकरे यांनी ठाकरे सरकारव साधला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शर्मिला ठाकरे येण्यापूर्वीच त्याठिकाणी भाजप आामदार रविंद्र चव्हाण आणि भाजप माजी नगरसेवक राहूल दामले आले. त्यांनी मनसेच्या शहर कार्यालय उद्घाटनास शुभेच्छा दिल्याने सगळ्यांच्या भूवया उंचावल्या. मनसे आणि भाजपची युतीच्या आधीच जवळीक वाढत असल्याचे चित्र पुन्हा एकदा अधोरेखित झाले.