ज्याला मृत समजून नदीत सोडले, तोच युवक १५ वर्षांनी घरी परतला; गावकरीही हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 13:49 IST2023-02-27T13:49:12+5:302023-02-27T13:49:28+5:30
ग्रामपंचायत सदस्य सत्येंद्र यादव यांना रविवारी व्हॉट्सअपवर ओळखीच्या व्यक्तीने एक फोटो पाठवला.

ज्याला मृत समजून नदीत सोडले, तोच युवक १५ वर्षांनी घरी परतला; गावकरीही हैराण
देवरिया - उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यात १५ वर्षानंतर मुलगा जिवंत घरी परतल्याची घटना घडली आहे. एका मुलाला सापाने दंश दिला होता ज्यात त्याचा मृत्यू झाला. घरच्यांनी सरयू नदीत त्याला वाहून दिले. परंतु तोच पुन्हा जिवंत होऊन घरी परतला. १५ वर्षांनी मृत मुलगा घरी परतलेला पाहून कुटुंबाला सुखद धक्का बसला. या घटनेची सर्वत्र चर्चा होऊ लागली. अनेकजण हे ऐकून हैराणही झाले.
भागलपूर ब्लॉकपासून मुरासो गावांत राहणाऱ्या रामसुमेर यादव यांचा मुलगा अंगेश ज्याला पंधरा वर्षापूर्वी सापाने चावले होते. त्याचे शरीर निळे झाले. घरच्यांनी तांत्रिकाकडे घेऊन उपचार केले मात्र तो जिवंत राहिला नाही. त्यानंतर घरचे त्याला घेऊन शरयू नदीकिनारी पोहचले तेव्हा बोटीत चढताना मृतदेहाचे लघुशंका केली. ते पाहून घरच्यांनी पुन्हा सरकारी हॉस्पिटल गाठले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. काहींनी मृतदेह केळाच्या पानात गुंडाळून शरयू नदीच्या प्रवाहात सोडण्यास सांगितले तसे घरच्यांनी केले.
त्यानंतर आता ग्रामपंचायत सदस्य सत्येंद्र यादव यांना रविवारी व्हॉट्सअपवर ओळखीच्या व्यक्तीने एक फोटो पाठवला. हा व्यक्ती गावात राहणारा आहे खूप वर्षांनी परतलाय परंतु त्याला गावचे नाव माहिती नाही असं सांगितले. तेव्हा हा फोटो गावात सगळ्यांना दाखवण्यात आला. जेव्हा फोटो व्हायरल झाला तेव्हा तो अंगेश असल्याचं समजलं. ज्याला सापाने दंश केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. अंगेशच्या कुटुंबियांनी गावातील काही लोकांसोबत जात युवकाचा शोध घेतला. या युवकाने गावातील एकाला ओळखले त्यानंतर हळूहळू आई, काकी यांची ओळख पटली. त्यानंतर त्याला गावात घेऊन आले. तो रस्ता स्वत: सांगू लागला. गावात उतरला आणि घरी गेला.
नेमकं काय घडलं होते?
जेव्हा अंगेशला शुद्ध आली तेव्हा तो पटना येथे आदिवासी लोकांमध्ये होता. घरची आठवण येत होती परंतु काहीच कळत नव्हते. सर्प पाळणाऱ्या अमन माली या व्यक्तीने त्याचा जीव वाचवला. त्याच्यावर आयुर्वैदिक उपचार केले. तो अमन मालीसोबतच राहू लागला. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर ७ वर्ष तो हरियाणात नोकरी करू लागला. २४ फेब्रुवारीला एका ट्रक ड्रायव्हरसोबत त्याची ओळख झाली जो आजमगडला जात होता.
तो त्या ट्रकने आजमगढला पोहचला. त्याठिकाणी आल्यावर गावचं नाव आठवत नव्हते. केवळ बेल्थरा रोड लक्षात होते. तो स्टेशन जवळील दुकानांजवळ पोहचला तेव्हा त्याच्या आठवणीत असणाऱ्या काही नावांची विचारणा त्याने दुकानदारांना केली. त्यातील मुन्ना यादव अशा व्यक्तीचे नाव त्याने घेतले जो अंगेशच्या गावात राहायचा. मुन्ना यादवला दुकानदार ओळखत होते. त्याच्या माध्यमातून गावातील सत्येंद्र यादव यांना माहिती देण्यात आली. मुलाचा फोटो पाठवण्यात आला. त्यानंतर अंगेशची ओळख पटली.