बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 18:26 IST2026-04-06T18:26:21+5:302026-04-06T18:26:53+5:30
कुटुंब आणि नातेवाईकांच्या पुढाकाराने दोघांमध्ये आधी बोलणे सुरू झाले. अखेर दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. सध्या हे दोघेही नोएडा येथे कुटुंबासह राहत आहेत.

बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
प्रयागराज - उत्तर प्रदेशातील पीसीएस अधिकारी ज्योती मौर्या आणि पती आलोक मौर्या यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आला होता. मात्र आता या वादाचा शेवट आनंदाने झाला आहे. या दोघांमधील वाद जवळपास अडीच वर्षांनी मिटले आहेत. या दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
माहितीनुसार, अडीच वर्षांनी ज्योती मौर्या आणि आलोक यांच्यातील वादावर तोडगा निघाला आहे. हे दोघे सोबत राहण्यास तयार आहेत. ज्योती मौर्याचे प्रमोशन झाले आहे. सध्या ती नोएडा येथे कार्यरत आहे. दुसरीकडे आलोक मौर्याने आपल्या कुटुंबाचे भवितव्य सुधारण्याचा निर्णय घेतला आहे. आलोक कामासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. यंदा आलोक यूपीपीसीएसच्या मुलाखतीपर्यंत पोहचले होते परंतु अंतिम यादीत त्यांची निवड झाली नाही.
ज्योती आणि आलोक मौर्याचे २०१० मध्ये झाले होते लग्न
ज्योती मौर्या आणि आलोक मौर्या यांचे लग्न २०१० मध्ये झाले होते. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात सर्व काही सुरळीत होते. परंतु त्यातच २०१५ साली ज्योती मौर्याची निवड पीसीएसमध्ये झाली. एसडीएम रूपाने तिने जबाबदारी सांभाळली. मात्र एसडीएम बनल्यानंतर ज्योती आणि आलोक यांच्या नात्यात दुरावा आला. ज्योती एसडीएमपदावर काम करत होती तर आलोक पंचायत राज विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करत होता.
अडीच वर्षांनी वाद मिटला
लग्नानंतर पत्नीच्या शिक्षणासाठी आलोकने सगळी मदत केली. परंतु एसडीएम बनताच ज्योतीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. या दोघांनी एकमेकांवर बरेच गंभीर आरोप केले होते. मात्र अडीच वर्षांनी या दोघांमधील वाद मिटून दोघे एकत्र आल्याचे दिसले. कुटुंब आणि नातेवाईकांच्या पुढाकाराने दोघांमध्ये आधी बोलणे सुरू झाले. अखेर दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. सध्या हे दोघेही नोएडा येथे कुटुंबासह राहत आहेत.
काय होता वाद? सोशल मीडियात चर्चा
अडीच वर्षापूर्वी उत्तर प्रदेशातील ज्योती मौर्या प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. आलोकने पत्नीवर अनैतिक संबंधांचे आरोप लावले होते. ज्योतीने घटस्फोटासाठी कौटुंबिक कोर्टात अर्ज दाखल केला होता. घटस्फोटावर सही करावी अन्यथा तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचा आरोप आलोकने ज्योती आणि तिच्या कथित प्रियकरावर लावला होता. चतुर्थ श्रेणी कर्मचारी असूनही कर्ज काढून पत्नीला शिकवले, पण अधिकारी बनताच तिचे अफेअर सुरू झाले आणि मला सोडून गेली असा आरोप करत आलोकने सोशल मीडियावर काही स्क्रीनशॉट शेअर केल्यापासून या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू झाली. ज्योतीनेही फसवून लग्न व हुंड्याचा आरोप आलोकवर केला होता.