निर्दोषत्वाला ठळक प्रसिध्दी का नाही?, एकनाथ खडसे यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 13:10 IST2018-08-31T13:09:37+5:302018-08-31T13:10:38+5:30
प्रसारमाध्यमांना रोकडा सवाल

निर्दोषत्वाला ठळक प्रसिध्दी का नाही?, एकनाथ खडसे यांचा सवाल
जळगाव : दाऊदच्या पत्नीशी संभाषण, जावयाची लिमोझीन कार, स्वीय सहायकाकडून लाचेची मागणी या विषयी झालेल्या आरोपांना प्रसारमाध्यमांकडून व्यापक प्रसिध्दी मिळाली; मात्र या प्रकरणांमधून मी निर्दोष ठरलो, त्याची फारशी दखल का घेतली गेली नाही, असा रोकडा सवाल भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला.
‘लोकमत’च्या भुसावळ विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात गुरुवारी सायंकाळी ते बोलत होते. खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते.
आरोपांच्या फैरी आणि त्याला व्यापक प्रसिध्दी मिळाली की, एखादा नेता राजकीय जीवनातून उठतो, याचे जिवंत उदाहरण माझे आहे. ४० वर्षांचे माझे राजकीय जीवन दोन महिन्यात उध्वस्त केले गेले. दूरचित्रवाहिन्यांनी २४ तास तर मुद्रित माध्यमांनी रकानेच्या रकाने माझ्याविरुध्द असलेल्या आरोपांविषयी खर्च केले. मात्र या प्रकरणांमध्ये तथ्य आढळून आले नाही, याविषयी प्रसारमाध्यमांनी ठळकपणे दखल घेतली नाही. माझ्यावर झालेला अन्याय दूर केला गेला नाही. दोन वर्षे मी न्यायाची प्रतीक्षा करीत आहे, असे खडसे म्हणाले.
लोकांना चटपटीत बातम्या वाचायला, ऐकायला आवडतात म्हणून त्याला अलिकडे प्रसारमाध्यमे महत्त्व देताना आढळतात. मात्र समाजातील तळागाळाला न्याय देण्याची भूमिका, सकारात्मक समाजउभारणीसाठी प्रोत्साहनभर कार्य प्रसारमाध्यमांनी करायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ‘लोकमत’ ने निर्भिड आणि निष्पक्ष भूमिका बजावल्याने महाराष्टÑाचा मानबिंदू ठरल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.