जळगाव : शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या कमी नाही. यात सर्वाधिक तरुण ते बिनधास्तपणे ट्रिपल सीट दुचाकी दामटत आहेत. दंडाची कारवाई करूनही त्यात सुधारणा झालेली नाही. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात शहर वाहतूक शाखेने ट्रिपल सीट दुचाकी चालविणाऱ्या १ हजार ८४७ जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ३ लाख ६९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दंड वसूल झाला म्हणून ट्रिपल सीटचा वापर कमी झाला असे नाही. कारवाया होत असल्या तरी वाहनधारकांच्या मानसिकतेत बदल झालेला नाही.
ट्रिपल सीट वाहने मू.जे.महाविद्यालय, नूतन मराठा महाविद्यालय, बेंडाळे चौक, नेरी नाका चौक तसेच मेहरूण परिसरातच धावताना दिसून येतात. पोलिसांना पाहून चकवा देण्याचे प्रकारदेखील घडतात. ट्रिपल सीट दुचाकी चालविणाऱ्या बहुतांश चालकांकडे वाहनाचा परवानाही नसतो. काही मुले तर अल्पवयीन आहेत. भरधाव वेगाने वाहने चालविली जात असली तरी त्याचे सोयरसुतक पालकांना नसल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले आहे. अती लाड हेच त्याला कारणीभूत ठरत आहेत. अपघात झाल्यानंतर काही पालकांच्या मानसिकतेत बदल होतो तर काही जण आपल्या पाल्याचा थोडीच अपघात झाला अशा मानसिकतेत असतात. मद्याच्या नशेत वाहन चालवून अपघाताच्या घटनादेखील शहरात वाढल्या आहेत. वाहतूक शाखा कारवाई करताना प्रबोधनदेखील करण्याचे काम करीत आहे, तरी देखील त्याचा परिणाम होत नाही.
दुचाकी चालकांनो, हे नियम पाळा
-वाहन चालविताना मोबाइलचा वापर करू नका
-दारू पिऊन वाहन चालवू नका
-विनाहेल्मेट दुचाकी चालवू नका
-धोकादायक पध्दतीने ओव्हरटेक करू नका
-भरधाव वेगाने वाहन चालवू नका
-नो पार्किंगमध्ये वाहन लावू नका
..तर दोन हजारांचा दंड
मद्यपान केला तर दंड .........२०००
विनाहेल्मेट........................५००
अल्पवयीन मुलांनी वाहन चालविणे..५००
रेड सिग्नल जंपिंग.................२००
दुचाकीवर तीन सीट.............२००
रहदारीस अडथळा...............२००
लायसन्स न बाळगणे........२००
किती जणांवर झाली कारवाई?
जानेवारी-२८१
फेब्रुवारी-२७४
मार्च- १५३
एप्रिल-८६
मे-१७५
जून-१८८
जुलै-२५७
ऑगस्ट-४३३