Lok Sabha Election 2019 : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी रचले षडयंत्र - भाजपाचे खासदार ए.टी.पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 23:24 IST2019-03-26T23:19:23+5:302019-03-26T23:24:09+5:30
गॉडफादर नसल्याने तिकिट कापले

Lok Sabha Election 2019 : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी रचले षडयंत्र - भाजपाचे खासदार ए.टी.पाटील
पारोळा, जि. जळगाव : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व भाजपाचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी षडयंत्र रचून आपला घात केला. माझ्या हितचिंतकांना सोबत घेत मला संपविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप भाजपाचे खासदार ए.टी.पाटील यांनी मंगळवारी पारोळा येथील कार्यकर्त्यांच्या सभेत केला. गेल्या निवडणुकीत माजी मंत्री एकनाथराव खडसे हे आपले गॉडफादर होते, मात्र या निवडणुकीत कुणीच गॉड फादर नसल्याने तिकीट कापले गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
खासदार पाटील म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून गिरीश महाजन आणि उदय वाघ यांनी ही खेळी रचली होती. ‘कुंपणानेच शेत खाल्ले, दाद मागावी कुणा कडे..’ अशी आपली गत झाली. पक्षाकडे देखील या लोकांनी माझी बदनामी केली. दोन वेळा सर्वेक्षण झाले. त्यावेळी आपले नाव आघाडीवर होते. त्यानंतर मात्र आपल्या सामाजिक बदनामीचा डाव जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि उदय वाघ यांनी रचला. पार्लमेंटरी बोर्ड व संघ आपल्या पाठीशी उभा होता. तरीदेखील माझे तिकीट कापले गेले याचे वाईट वाटले. मी जर चुकीचे वागलो असेल, तर भर चौकात फाशी द्या. पण अशी बदनामी करू नका असे आवाहन त्यांनी केले. जळगाव मतदारसंघातील चुकीच्या उमेदवारी संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या अकाऊंटवर तरुणांनी टिष्ट्वट करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांच्याकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
दोन दिवसानंतर आपली भूमिका स्पष्ट
सोमवारपासून मुंबईवरून आपल्याला सारखे फोन करून कोणतीही सभा व मेळावा घेऊ नका असे सांगितले जात होते. मात्र भीक आपण घातली नाही. यांची दादागिरी किती दिवस सहन करायाची असे सांगत दोन दिवसात उमेदवारी बाबत फेर विचार झाला नाही तर मग आपली भूमिका स्पष्ट करू असा इशारा त्यांनी दिला.