मतदानासाठी सुटी किंवा दोन तासाची मिळणार सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 21:10 IST2021-01-14T21:10:19+5:302021-01-14T21:10:33+5:30
ग्रामपंचायत निवडणूक : जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे निर्देश

मतदानासाठी सुटी किंवा दोन तासाची मिळणार सवलत
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. त्यामुळे मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून मतदारांना सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत निर्देश गुरूवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे.
जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी शुक्रवार मतदान होणार आहेत. त्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रांमध्ये मतदारांना मतदान करणे सोईचे व्हावे यासाठी निवडणूक होणा-या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी,कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणा-या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहणार आहे. त्यामध्ये खाजगी कंपन्यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्ये गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान व कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स आदींचा समावेश आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार,अधिकारी, कर्मचारी यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव अथवा उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन) यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासाची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहणार आहे.
तक्रार आल्यास कारवाई होणार
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातंर्गत येणा-या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादीच्या मालकांनी व्यवस्थापनाने या सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी, अशाही सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. मतदाराकडून मतदानाकरीता सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.