रोहिणीच्या भीषण अपघातात गावकऱ्यांनी दाखवली एकजूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST2021-07-02T04:12:07+5:302021-07-02T04:12:07+5:30
चाळीसगाव तालुक्यातील वाघडू येथील भगवान नगराज पाटील यांच्या शेतात तांदूळवाडी (ता. कन्नड) येथील विलास वसंत ठाकरे हे कुटुंबासह राहत ...

रोहिणीच्या भीषण अपघातात गावकऱ्यांनी दाखवली एकजूट
चाळीसगाव तालुक्यातील वाघडू येथील भगवान नगराज पाटील यांच्या शेतात तांदूळवाडी (ता. कन्नड) येथील विलास वसंत ठाकरे हे कुटुंबासह राहत होते. ते या परिसरात शेतमजुरी करीत असत. ठाकरे यांच्या गर्भवती पत्नीला प्रसूतीला आपल्या गावी सोडवण्यासाठी भगवान पाटील यांच्या दुचाकीने तांदूळवाडीकडे जात असताना ही घटना घडली.
चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावरील रोहिणी गावाजवळ सकाळपासून या रस्त्यावर छोटा हत्ती या वाहनाचे टायर फुटल्यामुळे रस्त्यात उभा होते. या वाहनांच्या काही अंतरावर कार व मोटारसायकलची समोरासमोर जोरदारपणे धडक झाली. त्याचा परिणाम इतका तीव्र होता की, जखमी दूरवर फेकले गेले व चार जणांचा बळी गेला. वाहनाचेही नुकसान झाले आहे. या घटनास्थळापासून काही अंतरावर आदल्या दिवशी सायंकाळी पाच वाजता समोरासमोर मोटारसायकलची धडक झाली. त्यात दोघे जण जखमी झाले होते.
ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी हॉटेल नक्षत्रचे मालक भिका दराडे व त्यांचा मुलगा, संजय घुगे, संजय सानप, संजय गिरे, लक्ष्मीवाडीतील आबा पाटील, नितीन दराडे तसेच तळेगाव येथील ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य केले. या गावकऱ्यांनी सर्वप्रथम जवळच असलेल्या तळेगाव येथील आरोग्य केंद्राचे वाहन बोलविले. नंतर चाळीसगावशी संपर्क साधून वाहनाची मागणी केली. तळेगावच्या वाहनातून गर्भवती महिला व एकाला तर चाळीसगावच्या वाहनातून अन्य जणांना उपचारासाठी पाठविले. तांदूळवाडी येथील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलाला धुळे येथे घेऊन जाण्यास १०८ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे रयत सेनेचे अध्यक्ष गणेश पवार यांनी वेळ न दवडता लगेच खाजगी रुग्णवाहिका स्वखर्चाने करून उपलब्ध करून जखमी मुलाला धुळे येथे हलविले.