आंबे पिकविण्यासाठी घातक रसायनाचा वापर, जळगावात १० टन आंबे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 13:35 IST2018-05-11T13:35:11+5:302018-05-11T13:35:11+5:30
मनपा आरोग्य विभागाकडून बळीरामपेठेतील गोडावूनवर छापा

आंबे पिकविण्यासाठी घातक रसायनाचा वापर, जळगावात १० टन आंबे जप्त
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ११ - सध्या आंब्याचा मागणीत वाढ झाली असल्याने आंबे विक्रेत्यांकडून आंबे लवकरात लवकर पिकावे यासाठी घातक रसायनांचा वापर होत असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी मनपा आरोग्य विभागाने शुक्रवारी सकाळी ८ वाजता शहरातील बळीराम पेठ भागातील आंब्याचा गोडावून मध्ये धाड टाकून १० टन आंबे तपासणीसाठी जप्त केले आहे.
मनपा आरोग्य विभागाकडे नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर दोन दिवसांपासून मनपा आरोग्य विभागाने आंब्याची तपासणी मोहीम सुरु केली आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास बळीराम पेठ भागातील एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील, अन्न व सुरक्षा अधिकारी एस.व्ही.पांडे, आरोग्य निरीक्षक अशोक नेमाडे, एस.पी.अत्तरदे, एस.बी.बडगुजर व कर्मचाऱ्यांचा पथकाने छापा टाकला. यामुळे आंबे विक्रेत्यांनी धावपळ देखील सुरु केली. तसेच तपासणी करु देण्यास नकार दिला. मात्र, कारवाईच्या भितीने नंतर विक्रेत्यांनी कारवाई करु दिली. या ठिकाणी विशिष्ट रसायन असलेले स्प्रे आणि कार्बाईडच्या पुड्या आढळून आल्या.