अमळनेरजवळ अन्नदानासाठी जाणारी रिक्षा उलटून दोन तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 21:34 IST2020-04-08T21:33:05+5:302020-04-08T21:34:39+5:30
लॉकडाऊन काळात गरिबांना अन्नदान करायला गेलेल्या तरुणांची रिक्षा उलटून दोन तरुण जागीच ठार व तीन जण जखमी झाले.

अमळनेरजवळ अन्नदानासाठी जाणारी रिक्षा उलटून दोन तरुण ठार
अमळनेर, जि.जळगाव : लॉकडाऊन काळात गरिबांना अन्नदान करायला गेलेल्या तरुणांची रिक्षा उलटून दोन तरुण जागीच ठार व तीन जण जखमी झाले. ही घटना ८ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास झाडी गावाजवळ घडली. ऋषिकेश उमेश शेटे (२०) व विशाल दिनेश पाटकरी (१८) अशी मयतांची नावे आहेत.
शहरातील श्रीरामनगर परिसरातील सात-आठ तरुण कोरोनाच्या लॉकडाऊन काळात गरिबांना अन्नदान करायला झाडी व मुडी गावाला गेले. मुडी येथून परतत असताना झाडी गावाजवळ त्यांची रिक्षा पलटली. त्यात ऋषीकेश उमेश शेटे, विशाल दिनेश पाटकरी हे दोघे जागीच ठार झाले. जयेश रमेश पाटील हा गंभीर जखमी झाल्याने त्याला प्रथमोपचार करून धुळे जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले, तर अक्षय नंदकुमार महाजन व चेतन राजेंद्र चौधरी हा किरकोळ जखमी झाला आहे.
त्यांच्यासोबत असलेल्या मोटारसायकलवरील तरुणांनी त्यांना प्रारंभी खासगी दवाखान्यात दाखल केले होते. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रकाश ताळे यांनी जखमींवर औषधोपचार केले.
मारवड पोलीस स्टेशनचे एपीआय राहुल फुला, एएसआय रोहिदास जाधव, हेडकॉन्स्टेबल भास्कर चव्हाण यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती.