पती व मुलाच्या मृत्यूमुळे खचलेल्या महिलेची जळगावात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 23:18 IST2018-02-05T23:14:20+5:302018-02-05T23:18:12+5:30
पती व तरुण मुलाच्या मृत्यूमुळे खचलेल्या सुनंदाबाई सयाजी पाटील (वय ४५, रा.जोशी पेठ, जळगाव) या महिलेने मेहरुण तलावात आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी साडे सात वाजता उघडकीस आली. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पती व मुलाच्या मृत्यूमुळे खचलेल्या महिलेची जळगावात आत्महत्या
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,५: पती व तरुण मुलाच्या मृत्यूमुळे खचलेल्या सुनंदाबाई सयाजी पाटील (वय ४५, रा.जोशी पेठ, जळगाव) या महिलेने मेहरुण तलावात आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी साडे सात वाजता उघडकीस आली. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तलावाकाठी आढळला मृतदेह
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मेहरुण तलाव परिसरात नागरिकांना सोमवारी सकाळी साडे सात वाजता तलावाकाठी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यांनी ही माहिती औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला कळविली. हेडकॉन्स्टेबल भरत लिंगायत व अशोक पाटील यांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा जागेवर पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.
अशी पटली ओळख
मृतदेहाजवळ आधारकार्ड, मतदान कार्ड किंवा मोबाईल नव्हता. ब्लाऊजमध्ये एका प्लास्टीकच्या कागदात एक मोबाईल सीम आढळून आले. पोलीस कर्मचारी भरत लिंगायत यांनी हे सीम कार्ड सुकलेल्या कपड्याने स्वच्छ केले, त्यानंतर मोबाईलमध्ये टाकले. त्यावरुन अर्चना नावाच्या पहिल्याच क्रमांकावर संपर्क साधला असता तो चाळीसगाव येथे चुलत पुतणी अर्चना हिला लागला. लिंगायत यांनी ज्या क्रमांकावरुन तुम्हाला फोन आला तो कोणाचा क्रमांक आहे, अशी चौकशी केली असता काकू सुनंदाबाई पाटील यांचा असल्याचे सांगितल्यावर मृतदेहाची ओळख पटली.