खान्देशकन्येच्या प्रतिभेला मानाचा सालाम, चाळीसगावच्या सामाजिक व साहित्य क्षेत्रात आनंदी सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 12:46 IST2018-03-23T12:46:34+5:302018-03-23T12:46:34+5:30

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव

socialist and literary community happiness | खान्देशकन्येच्या प्रतिभेला मानाचा सालाम, चाळीसगावच्या सामाजिक व साहित्य क्षेत्रात आनंदी सूर

खान्देशकन्येच्या प्रतिभेला मानाचा सालाम, चाळीसगावच्या सामाजिक व साहित्य क्षेत्रात आनंदी सूर

आॅनलाइन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. २३ - ‘अरे संसार संसार...जसा तवा चुल्यावर...’ मानवी जीवनाची अशी साधी परंतु तितकीच लोभस, तरल व्याख्या कवितेतून अजरामर करणा-या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला देऊन शासनाने खान्देश कन्येला मानाचा सलाम केला असल्याचा आनंदी सूर येथील सामाजिक व साहित्य क्षेत्रात उमटला.

अहिराणीचा सन्मान
उमविला खान्देश कन्या कवयत्रि बहिणाबाई चौधरींचे नाव देणे म्हणजे अहिराणीचा बोली भाषेचा सन्मानच आहे. ग्रामीण भागात मोठ्या संख्येने आहिराणी बोलणा-या भोळ्या-भाबड्या जनतेला विद्यापिठ आपले आहे. ही भावना निर्माण होईल. योग्य निर्णय.
- प्रा.डॉ. मिलिंद बिल्दीकर, प्राचार्य चाळीसगाव महाविद्यालय.

महिलांच्या कर्तृत्वाला न्याय
बहिणाबाईंनी निसर्गाची गुंफण मानवी जीवनाशी केली. लोककवी म्हणून त्यांचे स्थान आहे. महिला म्हणून त्यांनी साहित्य क्षेत्रात ठसा उमटविला आहे. त्यांचे नाव उमविला दिल्याने महिलांच्या कर्तृत्वचं अधोरेखित झाले आहे.
- प्रा.डॉ. एस.आर. जाधव, प्राचार्य य.ना.चव्हाण महाविद्यालय, चाळीसगाव

खान्देशाच्या लेकीचा गौरव
'बहिणाबाईंची काव्यप्रतिभा म्हणजे साहित्याचे बावनकशी सोनं' असा गौरव भाषाप्रभू प्र.के. अत्रे यांनी केला होता. शासनाने उमविला बहिणाबाईंचे नाव देऊन लेकीच्या प्रतिभेला सलाम केला आहे. निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
- प्राचार्य तानसेन जगताप, विभागीय कार्यवाह, मसाप, चाळीसगाव

विद्यापीठाचा लौकीक उंचावेल
बहिणाबाई चौधरी यांचा साहित्य प्रवास हेच एक स्वतंत्र विद्यापीठ आहे. ग्रामीण जनतेला व्यवहारीक शहाणपणाचा अजरामर संस्कार त्यांनी दिलायं. बहिणाबाईंच्या नाव वलयाने उमविला वेगाळी उंची मिळालीयं.
- डॉ. मुकूंद करंबेळकर, अध्यक्ष रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव.

मानाचा तुरा
बहिणाबाई चौधरी हे खान्देशाचं अभिजात वैभव आहे. पेढे वाटूनच शासनाच्या निर्णयाचे स्वागत झाले पाहिजे. उमविला त्यांचे नाव मिळणे म्हणजे विद्यापिठाच्या शिरपेचात मानाचा तुराच खोवला गेला आहे.
- डॉ. हेमांगी पुर्णपात्रे, अध्यक्षा शिशूविहार शिक्षण संस्था, चाळीसगाव.

आजि सोनियाचा दिनु
उमविला खान्देश कन्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव देणे हा स्वागतार्ह निर्णय आहे. यानिमित्ताने त्यांच्या सृजनशील साहित्याचा मोठा सन्मानच झाला आहे. पुढच्या अनेक पिढ्यांना त्यांच्या साहित्याचे मनोज्ञ दर्शनही होईल. कवयित्री म्हणून आनंद झाला आहे.

- लिलाताई यशवंत पाटील, कवयित्री, मा. सभापती, पं.स.चाळीसगाव

खान्देशाला न्याय आणि सन्मान
मराठी ही मनाला निर्सर्गाशी जोडणारी भाषा असल्याचे बहिणाबाई चौधरी यांनी सिद्ध केले. कमी शिक्षण असूनही आपल्या अलौकीक प्रज्ञेतून त्यांनी साहित्याची उंची वाढवली. शासनाने त्यांचे नाव उमविला देऊन खान्देशला न्याय देऊन सन्मानही केला आहे.
- वसंतराव चंद्रात्रे, साहित्यिक, मा. सिनेट सदस्य, उमवि, चाळीसगाव

प्रेरणादायी निर्णय
बहिणाबाई चौधरी यांची प्रतिभा उपजत होती. त्यांच्या साहित्यातून समाज घडविण्याची प्रक्रिया खंडीत होऊ शकत नाही. प्रेरणास्त्रोत म्हणूनही त्या अविस्मरणीय आहेत. शासनाने त्यांचे नाव उमविला देऊन खान्देशाचा लौकीक वाढवला आहे.
- संपदा पाटील, अध्यक्षा, उमंग समाजशिल्पी महिला परिवार, चाळीसगाव.

Web Title: socialist and literary community happiness