हरिनामाच्या गजरात अवघी शेंदुर्णी दुमदुमली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 21:52 IST2019-11-11T21:49:26+5:302019-11-11T21:52:27+5:30
खान्देशचे प्रतिपंढरपूर म्हणून भाविकांचे श्रद्धास्थान असेलल्या श्री त्रिविक्रम महाराज विठ्ठल रुक्मिणी रथोत्सवात हरिनामाच्या गजराने अवघी शेंदुणीनगरी दुमदुमून गेली.

हरिनामाच्या गजरात अवघी शेंदुर्णी दुमदुमली
शेंदुर्णी, ता.जामनेर, जि.जळगाव : खान्देशचे प्रतिपंढरपूर म्हणून भाविकांचे श्रद्धास्थान असेलल्या श्री त्रिविक्रम महाराज विठ्ठल रुक्मिणी रथोत्सवात हरिनामाच्या गजराने अवघी शेंदुणीनगरी दुमदुमून गेली. हजारो भाविक भक्तांनी रथाचे दर्शन घेतले.
श्री संत कडोजी महाराजांनी १७४४ सालापासून रथोत्सवास प्रारंभ केला. या परंपरेनुसार ११ रोजी कार्तिक शुध्द चतुर्दशीला दुपारी १२ वाजता श्री संत कडोजी महाराजांच्या मूर्तीची व रथाची महापूजा नगराध्यक्षा विजया खलस,े अमृत खलसे, संत कडोजी महाराज संस्थानचे आठवे गादीवारस शांताराम भगत व शारदा कैलास देशमुख, गायत्री देशमुख, माजी सरपंच सीमा पवार, राजेंद्र पवार, योगिता चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय गरुड, सुधाकर बारी, सागरमल जैन, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यासह भूषण देवकर आदी मान्यवरांच्या हस्ते संत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रथाची परंपरागत पूजन झाल.
त्यानंतर रथ मिरवणुकीस सुरूवात झाली. २७५वा रथोत्सव सागवानी लाकडाच्या २५ फुट उंचीच्या भव्य रथाला झेंडूच्या व गुलाबाच्या पुष्पमाळांनी आकर्षक सजविले होते. रथाचा तोल सांभाळण्यासाठी रथाच्या चाकाला मोगरी लावणाऱ्यांंची दमछाक होत होती. ठिकठिकाणी रथ थांबला असता भाविक श्रीफळ, केळी कानगी वाहून रथाचे दर्शन घेतले. या मिरवणुकीत असलेल्या विठ्ठल मूर्तीची पालखीचे दर्शन भाविकांनी घेतले. ढोलताशे, महिला व पुरुष भजनी मंडळे यांचा टाळमृदुंग व हरिनामाच्या गजराने आसमंत गर्जून गेला होता. गावातील प्रतिष्ठांनी भजन गायनाचा आनंद लुटला. बैलगाडीवर देवदेवतांची पौराणिक दृष्याची वहने कडोजी महाराजांची प्रतिमा यांने मिरवणुकीची शोभा वाढविली.मिरवणूकीमधील भाविक भक्तांना चहापानाची व्यवस्था काही व्यापाऱ्यांनी केली होती.
कोणताही अनुचित प्रकार न घडता रथोत्सव शांततेत पार पडला व सायंकाळी सातला रथ रथघराजवळ पोहचल्यानंतर आरती करण्यात आली.
यात्रोत्सव
सोनद नदीच्या पात्रात यात्रा भरली. यात्रेत भांड्यांची दुकाने, उपहारगृहे, रहाट पाळणे, विद्युत पाळणे उभारण्यात आले आहे. १५ दिवस चालणाºया या यात्रेचा आनंद लुटण्यासाठी अबालवृद्ध हजेरी लावणार आहेत.
याप्रसंगी यांच्या मार्गदर्शना खाली पहूर ए.पी.आय. परदेशी राकेशसिंग, पी.एस.आय. किरण बर्गे व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.