१० तालुक्यांना तरी कोरोनापासून वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 12:41 IST2020-05-17T12:39:49+5:302020-05-17T12:41:06+5:30

लॉकडाऊनचे चौथे पर्व सुरु झाल्यानंतरही भीती कायम, तीन पर्वातील चुकांची पुनरावृत्ती टाळण्याची आवश्यकता, कोरोनापासून बचाव आणि सुरळीत व्यवहाराचा मेळ साधावा

Save at least 10 talukas from Corona | १० तालुक्यांना तरी कोरोनापासून वाचवा

१० तालुक्यांना तरी कोरोनापासून वाचवा

मिलिंद कुलकर्णी
कोरोनापासून बचाव करण्यासाठी जगातील इतर देशांप्रमाणे आपणदेखील लॉकडाऊनचा पर्याय स्विकारला. तीन पर्वात ५$४ दिवस लॉकडाऊन होते. त्याच्या लाभ वा हानीविषयी मतमतांतरे असली तरी आता कोरोनापासून बचाव करीत व्यवहार सुरळीत करण्याचे मोठे आव्हान राहणार आहे.
खान्देशचा विचार केला तर तीन जिल्ह्यांपैकी नंदुरबार हा जिल्हा आॅरेंज झोनमध्ये आहे. तेथील रुग्णसंख्या पाव शतकाच्या उंबरठ्यावर आहे. दोघांचा मृत्यू झाला असून १५ जण कोरोनामुक्त झाले आहे. या जिल्ह्यातील सहा तालुक्यांपैकी नवापूर, तळोदा आणि धडगाव या तीन तालुक्यांमध्ये अद्याप शिरकाव नाही. नंदुरबार, तळोदा आणि शहादा या तीन तालुक्यांमध्ये बऱ्यापैकी नियंत्रण आले आहे. धुळे जिल्हा हा चार तालुक्यांचा आहे. धुळे, शिंदखेडा, साक्री व शिरपूर या चारही तालुक्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पाऊण शतकाकडे वाटचाल करणाºया या रेड झोनमधील जिल्ह्यात धुळ्याचा वाटा सर्वात मोठा आहे. साक्री शहरात जसे रुग्ण आढळले तसेच शिरपूर व शिंदखेड्यातील ग्रामीण भागातही दिसून आले. त्यामुळे शहरी, ग्रामीण असे सूत्र याठिकाणी दिसले नाही. मृत्यू ९ जणांचे झाले असून २४ जण मुक्त झाले आहेत. रेड झोनमधील जळगाव जिल्ह्यात अडीचशेचा टप्पा ओलांडला आहे. त्यात एकट्या अमळनेरचा वाटा १०५ एवढा आहे. जळगाव : ५४ व भुसावळ : ५३ अशी रुग्णसंख्या आहे. याचा अर्थ या तीन तालुक्यांमध्ये कोरोनाचा विस्फोट आहे. चोपडा (१४), पाचोरा (२०), भडगाव (८) आणि अलिकडे फैजपूर (ता.यावल) येथे दोघे कोरोनाबाधित आहेत. रुग्ण बरे झाल्याची संख्या ४८ आहे. मात्र ३३ जणांचा मृत्यू झाला आहे, हे चिंताजनक आहे. मृत्यूदरात जळगाव जिल्हा हा राज्यात सर्वाधिक आहे. तब्बल १२.६२ टक्के रुग्ण दगावले आहेत. जळगाव शहरातील टक्केवारी २० आहे तर ग्रामीण भागातील ११ टक्के एवढी आहे. कोरोनाचा उद्रेक झालेल्या मालेगावात ५.६ टक्के तर पुण्यात ३.३१ टक्के आहे. आरोग्य यंत्रणा काही कारणे देत असले तरी त्यावर विश्वास ठेवायला लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य जनता तयार नाही. आरोग्य यंत्रणेने सबबी सांगण्यापेक्षा आता हा मृत्यूदर आटोक्यात कसा येईल, यासाठी प्रयत्न करायला हवे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासनदरबारी पाठपुरावा करायला हवा. आता आयएमएचे डॉक्टर कोविड रुग्णालयात सेवा देऊ लागल्याने याचे सकारात्मक परिणाम दिसतील, अशी आशा आहे. रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, एरंडोल, जामनेर, पारोळा, चाळीसगाव हे तालुके कोरोनापासून दूर आहेत. आता या तालुक्यांवर लक्ष केंद्रित करायला हवे. १५ तालुक्यांमध्ये झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळून १० तालुक्यांमध्ये उपाययोजना करायला हव्यात. याचसोबत १४ तालुक्यांमधील बाधा आटोक्यात येण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे. प्रसंगी कठोर भूमिका प्रशासनाने स्विकारावी.
खान्देशातील २५ तालुक्यांपैकी १५ तालुक्यांना कोरोनाचा विळखा आहे. १० तालुके अद्याप सुरक्षित असल्याने तेथे शिरकाव होणार नाही, याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तीन पर्वात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळावी.
लॉकडाऊनच्या तीन पर्वात काय चुका
झाल्या, त्याची उजळणी करण्यापेक्षा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि जनता यांनी आपापली जबाबदारी ओळखून काम केले तरी लॉकडाऊनचे चौथे पर्व अधिक हानी करणारे नसेल. कोरोनावरील प्रतिबंधक औषध मिळेपर्यंत त्यापासून बचाव करणे आणि जीवनशैलीत बदल करुन व्यवहार सुरळीत करणे हा पर्याय आपल्यापुढे आहे.

Web Title: Save at least 10 talukas from Corona

टॅग्स :Jalgaonजळगाव