जळगाव : अंघोळ करत असताना तुटलेल्या विजेच्या बोर्डाला स्पर्श होऊन विजेच्या धक्क्याने भगवान सुखराम परदेशी (वय ५५) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजता रायपूर, ता.जळगाव येथे घडली.
परदेशी यांचे पार्टिशनचे घर आहे. रविवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे अंघोळीसाठी गेले. यादरम्यान अंघोळीच्या ठिकाणी तुटलेल्या विजेच्या बोर्डाला परदेशी यांचा स्पर्श झाला. बोर्डातील विद्युत प्रवाहामुळे परदेशी यांना जोरदार विजेचा धक्का बसला यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबीयांनी तत्काळ परदेशी यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. भगवान परदेशी यांच्या पश्चात पत्नी नथाबाई व विवाहित दोन मुले अनिल व गजानन व दोन मुली असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.