बेलगंगेच्या सातबारा उताऱ्यावर ‘अंबाजी’चे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 18:37 IST2018-08-17T18:36:44+5:302018-08-17T18:37:20+5:30

हरकती फेटाळल्या : चाळीसगावव तालुक्याच्या आशा पल्लवित

The name of 'Ambaji' on the seventeenth century in Belgaum | बेलगंगेच्या सातबारा उताऱ्यावर ‘अंबाजी’चे नाव

बेलगंगेच्या सातबारा उताऱ्यावर ‘अंबाजी’चे नाव


चाळीसगाव, जि.जळगाव : बेलगंगा साखर कारखान्याच्या सातबारा उताºयावर अखेर ‘अंबाजी शुगर इंडस्ट्रीज’चे नाव लागले असून येत्या हंगामात कारखान्यातून गाळप सुरु व्हावे, अशा अपेक्षा तालुकाभरातून पल्लवित झाल्या आहेत. मुख्य प्रवर्तक चित्रसेन पाटील यांना मंगळवारी महसूल विभागाने पत्र दिले असून सर्व हरकती फेटाळून लावल्या आहेत. ही प्रक्रिया सहा महिने चालली.
जिल्हा मध्यवर्ती बँकेची मालकी असणारा बेलगंगा साखर कारखाना अंबाजी ग्रुपने लिलावात ४० कोटी रुपयांना विकत घेतला. यासाठी भूमीपुत्रांची साखळी जोडून रक्कम संकलित केली गेली. ११ जानेवारी रोजी हस्तांतर प्रक्रियादेखील पूर्ण झाली. मात्र विक्री प्रक्रियेवर हरकती घेतल्याने सातबाºयावर अंबाजीचे नाव लागले नव्हते. मंगळवारी महसूल विभागाने सातबाºयावर नाव लागल्याचे पत्र दिले. यानंतर अंबाजीच्या नावाचा आॅनलाईन सातबारा उताराही काढण्यात आला.
हरकती फेटाळल्या, आशा पल्लवित
बेलगंगा विक्री प्रक्रियेवर एकूण सात हरकती घेण्यात आल्या होत्या. हरकतींवर दोन ते अडीच महिने तहसीलदारांसमोर सुनावणी देखील झाली. या सर्व हरकती फेटाळण्यात आल्याने बेलगंगेच्या उताºयावर ‘अंबाजी’चे नाव लावण्यात आले. या सर्व प्रक्रियेत सहा महिने गेले.
चाळीसगाव तालुक्यात सद्य:स्थितीत मोठ्या प्रमाणावर ऊस उभा आहे. गेल्या महिन्यात कारखान्यात रोल आणि गव्हाणीचे पूजन झाले. ऊसतोड मजुरांशी करारही करण्यात आला असून, त्यांना चार कोटी रुपये वाटण्यात आले आहे. कारखाना ट्रायल सिझनसाठी सज्ज होत आहे. त्यामुळे येत्या हंगामात कारखान्यातून गाळप व्हावे. अशा अपेक्षा व्यक्त होत आहे.
२००९ मध्ये कारखान्याचे गाळप सुरू असतानाच त्याला कुलूप लागले. मध्यंतरीच्या १० वर्षात तालुक्याचे राजकारण कारखान्याभोवती फिरत राहिले. निवडणुकींचे जाहीरनामे असो की भाषणे बेलगंगेचा नुसता जप झाला. पदयात्राही निघाल्या. मात्र कारखान्याचे कुलूप उघडले गेले नाही, ही वस्तुस्थिती आहे.
माजी चेअरमन चित्रसेन पाटील यांनी भूमीपुत्रांना एकत्र करुन लोकसहभागातून कारखाना विकत घेतला. यामुळे तालुक्याच्या राजकीय सारीपाटावर मोठी कलाटणी मिळण्याचे स्पष्ट संकेत दिसू लागले आहे. उंबरठ्यावर आलेल्या लोकसभा आणि पुढील वर्षी होणाºया विधानसभेच्या निवडणुकीत ‘बेलगंगे’च्या नावाने ‘चांगभलं’ होणार असल्याचे सूरदेखील आत्तापासूनच उमटू लागले आहे.
बेलगंगा ते अंबाजी
१९७८ मध्ये पहिल्यांदा बेलगंगा कारखान्यातील यंत्रे फिरली. तालुक्यात गोड अर्थकारणासह उन्नत्तीचा पाया रचला गेला. गेल्या ४० वर्षाच्या कालखंडात कारखान्यात अनेक स्थित्यंतरे घडून आली. एकेकाळी चाळीसगाव तालुक्यासाठी ‘कुबेर’ ठरलेला हा कारखाना दहा वर्षे बंदही राहिला. येत्या गाळप हंगामासाठी कारखाना सज्ज होत असतांना चाळीस वर्षाच्या प्रवासाला उजाळा मिळणार आहे.

नाव असेल ‘बेलगंगा’च
बेलगंगा या नावाशी तालुक्याचे भावनिक नाते जुळले आहे. ‘बेलगंगा’ ही एक अमीट ओळख असून कारखाना विकत घेतला असला तरी त्याचे नाव बदलणार नाही. यापुढेही ‘बेलगंगा’ हे नाव कायम राहणार आहे.
- चित्रसेन पाटील
माजी चेअरमन, बेलगंगा साखर कारखाना, चाळीसगाव

Web Title: The name of 'Ambaji' on the seventeenth century in Belgaum