महापालिका अतिक्रमण विभागाने केली ७२ लाखांची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:19 IST2021-08-23T04:19:14+5:302021-08-23T04:19:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर मार्च २०२० पासून मुख्य बाजारपेठांवर बंधने घालण्यात आली ...

महापालिका अतिक्रमण विभागाने केली ७२ लाखांची वसुली
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर मार्च २०२० पासून मुख्य बाजारपेठांवर बंधने घालण्यात आली होती. तसेच नियमांचे काटेकोर पालन न करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश प्रशासनाकडून काढण्यात आले होते. मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत एकूण ७२ लाखांची वसुली केली आहे. एकीकडे या काळात इतर मालमत्तांची वसुली थांबली असताना, दुसरीकडे अतिक्रमण विभागाने या काळात ७२ लाखांची वसुली करून, मनपाच्या उत्पन्नात वाढ केली आहे.
कोरोनाचा विळखा कमी करण्यासाठी व शासनाने दिलेले नियम पाळले गेले पाहिजे यासाठी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने गेल्या दोन वर्षांत मोठी कामगिरी बजावली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या विभागाला ५० कर्मचाऱ्यांची गरज आहे अशा विभागातील केवळ १५ जणांनी ही इतकी मोठी कामगिरी बजावली आहे. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत ३६ लाख २२ हजार ५८५ रुपयांची वसुली मनपाच्या अतिक्रमण विभागाने केली तर एप्रिल २०२१ ते जुलै २०२१ या केवळ ४ महिन्याच्या कालावधीत याच विभागाने ३६ लाख २३ हजार ७४५ रुपये इतकी दंडात्मक कारवाई केली आहे.
एकाही कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण नाही
महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने गेल्या वर्षभरापासून एकही रजा न घेता एकही दिवस कामावरची टाळाटाळ न करता ही इतकी वसुली केली आहे. अशी माहिती महानगरपालिका अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली. याचबरोबर ते असेही म्हणाले की सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे अनेक कोरोना काळात नागरिकांमध्ये जाऊन काम करत असताना देखील अतिक्रमण विभागातील एकाही कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झालेली नाही.
४०० हून अधिक दुकाने केली सील
महापालिकेने लॉकडाऊनच्या काळात नियमांचे पालन न करणाऱ्या ४०० हून अधिक दुकानदारांवर कारवाई केली आहे. या कारवाईमधून सुमारे ४२ लाखांची वसुली महापालिकेने केली आहे. यासह रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांसह मंगल कार्यालय, हॉटेल व्यवसायांवर कारवाई करून, सुमारे २० लाखांची वसुली मनपाकडून करण्यात आली आहे.