मुंबईच्या सुरक्षा एजन्सीची बांधकाम विभागाच्या कामाबाबत नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:12 IST2021-06-27T04:12:04+5:302021-06-27T04:12:04+5:30
आनंद सुरवाडे जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात फायर ऑडिट वेळोवेळी होणे गरजेच असून, हे काम वेगाने व ...

मुंबईच्या सुरक्षा एजन्सीची बांधकाम विभागाच्या कामाबाबत नाराजी
आनंद सुरवाडे
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात फायर ऑडिट वेळोवेळी होणे गरजेच असून, हे काम वेगाने व पारदर्शक होणे अपेक्षित असल्याचे सांगत राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी, मुंबईचे सहायक संचालक संजय पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. ते प्रशिक्षणासाठी जीएमसीत आले होते. रुग्णालयात लागणाऱ्या आगीवर प्रतिबंधक उपाययोजना तातडीने करता याव्यात याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांना अग्निसुरक्षा प्रतिबंधक प्रशिक्षण विभाग देण्यात आले.
राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी, मुंबईचे सहायक संचालक संजय पाटील, तज्ज्ञ सदस्य विक्रम देसाई यांनी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे मंचावर उपस्थित होते. आग रोखण्यासाठी मॅन्युअल फायर अलार्म प्रणाली कार्यान्वित ठेवली पाहिजे. त्यासह अग्निशमन दलाला कळवून आपल्या कर्मचारी वर्गाला धीर देऊन योग्य सूचना करीत आग प्रतिबंधक उपकरणांचा वापर केला पाहिजे. वेळोवेळी फायर ऑडिट करून घ्यावे, अशी माहिती त्यांनी दिली.
सा. बां. विद्युत विभागाकडे अपूर्ण माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवार व शुक्रवारी फायर ऑडिट करण्यात आले. आलेल्या टीमने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काही कागदपत्रे व तांत्रिक माहिती मागितली. मात्र, त्यांच्याकडे पुरेशी कागदपत्रे किंवा माहिती उपलब्ध नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. यामुळे या ऑडिटमध्ये अडचणी आल्या. आता एक ते दीड महिन्यांनी याचा अहवाल येणार असून, त्यानंतर त्रुटी दूर करण्यात येणार आहेत.
दुर्लक्ष का?
काही रुग्णालयांत आगी लागल्याच्या घटना मध्यंतरी समोर आल्या होत्या. त्यावेळी फायर ऑडिटचा मुद्दाही ऐरणीवर आला होता. जीएमसीत यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, याची मुख्य जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होतेय का ? असा एक प्रश्न समोर आला आहे. वेळोवेळी हे ऑडिट होणे गरजेचे आहे. यासाठी जीएमसीत स्वतंत्र समिती असून, तांत्रिक बाबी या बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाची जबाबदारी आहे, असे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुंबईच्या अधिकाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केल्याने बांधकाम विभागाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.