महावितरणचा थकबाकीदारांना ` शॉक `

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:19 IST2021-01-19T04:19:02+5:302021-01-19T04:19:02+5:30

जळगाव : कोरोनामुळे अनेक ग्राहकांनी विजबिल भरण्याकडे पाठ फिरवली असून, परिणामी खान्देशात ६०० कोटींच्या घरात थकबाकी पोहचली आहे. ग्राहकांनी ...

MSEDCL's 'shock' to arrears | महावितरणचा थकबाकीदारांना ` शॉक `

महावितरणचा थकबाकीदारांना ` शॉक `

जळगाव : कोरोनामुळे अनेक ग्राहकांनी विजबिल भरण्याकडे पाठ फिरवली असून, परिणामी खान्देशात ६०० कोटींच्या घरात थकबाकी पोहचली आहे. ग्राहकांनी थकबाकी भरण्याबाबत महावितरणने आक्रमक भूमिका घेतली असून,जळगावसह धुळे व नंदुरबार मिळून १ हजार ७६२ थकबाकीदारांना बिल भरण्याबाबत नोटीसा बजावल्या आहेत. तसेच दिलेल्या मुदतीत बिलाचा भरणा न केल्यास, अशा थकबाकीदारांचा थेट विज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने महावितरणतर्फे शासनाच्या आदेशानुसार घरोघरी जाऊन रिडींग न घेता, ग्राहकांना सरासरी बिले देण्यात आली. मात्र, देण्यात आलेली सरासरी बिले ही जादा असल्याच्या अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्या. ग्राहकांच्या या तक्रारी सोडविण्यासाठी महावितरणने जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ठिकठिकाणी शिबिरे घेतली.

यामध्ये अनेक ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येऊन, विजबिल भरण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच ग्राहकांना हफ्त्यानेही बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती.

मात्र, तरीदेखील खान्देशातील घरगुती, औद्योगिक, कृषी, लघु आदी ग्राहकांनी मार्च २०२० पासून विजबिल भरण्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस थकबाकीदारांची संख्या वाढत असून, वसुलीसाठी महावितरणपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

इन्फो :

कृषी पंपधारक ग्राहकांना वगळले

महावितरणच्या जळगाव परिमंडळात घरगुती, कृषी, औद्योगिक, वाणिज्य व इतर असे एकूण २२ लाखांच्या घरात ग्राहक आहेत. यामध्ये साडेतीन लाख ग्राहक हे कृषी पंप धारक शेतकरी आहेत. शासनाच्या सुचनेनुसार या कृषी पंपधारक शेतकऱ्यांना थकबाकी भरण्याबाबत कुठलीही नोटीस पाठविण्यात आलेली नाही.

इन्फो :

कोरोनामुळे कारवाई लांबली

शासनाने लॉकडाऊन कालावधीत घरोघरी जाऊन रिडींग न घेता, ग्राहकांना सरासरी विजबिले देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महावितरणतर्फे सरासरी बिले देण्यात आली. तसेच शासनातर्फे कोरोना काळात थकबाकीदार ग्राहकांकडुन कुठलीही वसुली अथवा कारवाई न करण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्यामुळे महावितरणतर्फे कोरोनामुळे थकबाकीदारांविरोधात कुठलिही कारवाई करण्यात आली नाही. मात्र, शासनाने नुकतेच हे निर्बध उठविल्यामुळे, महावितरणतर्फे थकबाकीदारांना नोटीसा पाठवून, कारवाईचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.

इन्फो :

महावितरणतर्फे जास्त क्षमतेच्या विज वापर असलेल्या थकबाकीदार ग्राहकांना बिल भरण्याबबात नोटीस बजावण्यात येत असून, आतापर्यंत १ हजार ७६२ ग्राहकांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. थकबाकीदारांची संख्या मोठी असल्यामुळे महावितरणतर्फे शहर व ग्रामीण भागातील प्रत्येक वायरमनला कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. कोरोनामुळे थांबलेली वसुलीची मोहिम आता सुरू करण्यात आली आहे.

दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता, महावितरण जळगाव परिमंडळ.

Web Title: MSEDCL's 'shock' to arrears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.