जळगाव पालिकेचे खुले नाट्यगृह जपतेय बालगंधर्वांच्या ऋणानुबंधाच्या आठवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 12:26 IST2019-06-26T12:26:13+5:302019-06-26T12:26:31+5:30
विशेष परवानगीसाठी शासनाकडे पाठपुराव्याची गरज

जळगाव पालिकेचे खुले नाट्यगृह जपतेय बालगंधर्वांच्या ऋणानुबंधाच्या आठवणी
जळगाव : एफएसआयअभावी बालगंधर्व खुल्या नाट्यगृहाचे बंदीस्तीकरण रखडले आहे. जळगावातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून बालगंधर्वांच्या जळगावशी ऋणानुबंधाच्या आठवणी जपण्यासाठी हे खुले नाट्यगृह बंदिस्त करावे, अशी अपेक्षा रसिकांकडून व्यक्त होत आहे.
नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच बालगंधर्व जळगावात त्यांच्या शास्त्रीय संगीत शिक्षणाचा पाया घातला गेला. जळगावातील उस्ताद मेहबूब खान हे त्यांचे पहिले गुरू. बालगंधर्व म्हणून ते नटसम्राट पदाला पोहोचल्यावरही जळगावला आवर्जून भेट देत. जळगावला १९०७मध्ये भरलेल्या पहिल्या कविसंमेलनालाही ते उपस्थित होते.
पालिकेने जपल्या आठवणी
बालगंधर्वांच्या या आठवणी जपण्यासाठी त्यांच्याच नावाने ‘बालगंधर्व खुले नाट्यगृह’ तत्कालीन नगरपालिकेने उभारले. त्याचा कोनशिला शुभारंभ २१ सप्टेंबर १९६० रोजी राज्याचे तत्कालीन महसूल उपमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते झाला. यावेळी पालिकेचे अध्यक्ष जयवंतराव खंडेराव पाटील, उपाध्यक्ष सुकदेवराव गणपतराव यादव उपस्थित होते.
तर २९ जानेवारी १९६१ मध्ये या खुल्या नाट्यगृहाचे उद्घाटन राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी तत्कालीन नगराध्यक्ष बाजीराव भगुलाल श्रावगी, उपाध्यक्ष काशिनाथ हरी कोळी, पालिका अभियंता एन.के. बोंडे उपस्थित असल्याचे कोनशिलेवर नमूद आहे.
अडचण काय?
निविदा न येण्याचे कारण म्हणजेच ठेकेदाराला गुंतवणुकीच्या बदल्यात परतावा मिळण्याची शाश्वती काय? हे आहे.
बंदीस्त करण्याचा संकल्प अपूर्णच
त्यानंतर या खुल्या नाट्यगृहाचे बंदिस्त नाट्यगृहात रूपांतर करण्याचा निर्णय १९८८ मध्ये बालगंधर्व शताब्दी सोहळ्याप्रसंगी घेण्यात आला. बालगंधर्व खुले नाट्यगृह व नवीन बी.जे. मार्केटचा सर्व्हे क्रमांक एकच असल्याने व एफएसआय बी.जे. मार्केटसाठी वापरला गेल्याने हे खुले नाट्यगृह बंदिस्त करण्यासाठी नगररचना विभागाची परवानगी मिळणे अशक्य असल्याने हे काम रखडले. हे काम बीओटी तत्वावर देखील होणे अशक्य असल्याचे चित्र आहे.
विशेष बाब म्हणून परवानगी आवश्यक
अपुऱ्या एफएसआय अभावी नाटयगृह बदिस्त करण्याचे काम रखडले असून बीओटी तत्त्वावरदेखील हे काम होणे अशक्य असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अन्य पर्याय न सापडल्यास शासनाने विशेष बाब म्हणून मंजुरी देऊन हे काम मार्गी लागू शकेल. यासाठी पाठपुरावा करून बालगंधर्वांच्या जळगावशी ऋणानुबंधाच्या आठवणी जपण्यासाठी अपेक्षा व्यक्त होत आहे.