मनपाने फक्त स्वतंत्र नवीन कनेक्शन द्यावे, पाण्याच्या टाकीचा घाट नको...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST2021-02-05T05:59:32+5:302021-02-05T05:59:32+5:30
जळगाव : अपार्टमेंटमध्ये वाहने पार्किंगसाठी जागा नसताना, मनपाने नवीन पाण्याच्या टाकीचा घाट घालू नये, आहे त्या टाक्यानांच ...

मनपाने फक्त स्वतंत्र नवीन कनेक्शन द्यावे, पाण्याच्या टाकीचा घाट नको...
जळगाव : अपार्टमेंटमध्ये वाहने पार्किंगसाठी जागा नसताना, मनपाने नवीन पाण्याच्या टाकीचा घाट घालू नये, आहे त्या टाक्यानांच स्वतंत्रपणे नवीन नळ कनेक्शन द्यावे, अशी मागणी चंदन अपार्टमेंटमधील नागरिकांमधून करण्यात येत आहे.
मनपा प्रशासनाने अमृतअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आल्यामुळे नागरिकांना नळ कनेक्शन देण्यास सुरुवात केली आहे. अपार्टमेंटमधील रहिवाशांना स्वतंत्र कनेक्शन न देता एका अपार्टमेंटला एकच कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. या अपार्टमेंटधारकांना आवारात पाण्याची टाकी तयार करायची आहे. मात्र, मनपाच्या या निर्णयाला नागरिकांमधून विरोध होत आहे. प्रतापनगरातील ३५ वर्षांपूर्वी बांधलेल्या चंदन अपार्टमेंटमधील नागरिकांनी मनपाच्या या निर्णयाला विरोध केला आहे. या अपार्टमेंटमध्ये १२ फ्लॅट असून, प्रत्येकाच्या स्वतंत्र पाण्याच्या टाक्या व नळ कनेक्शन आहेत. अपार्टमेंटचा परिसर लहान पडत असल्याने, रहिवाशांना अपार्टमेंटबाहेर वाहने लावावी लागत आहेत. असे असताना मनपाने अपार्टमेंटधारकांना अपार्टमेंटमध्ये स्वतंत्र पाण्याची टाकी उभारण्याचे सांगितल्याने ही टाकी उभारावी कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोट :
आमच्या अपार्टमेंटमध्ये १२ फ्लॅट असून, प्रत्येकाच्या स्वतंत्र टाक्या व नळ कनेक्शन आहेत. मनपाने अमृत योजनेंतर्गत नवीन टाकीची सक्ती न करता, आहे त्या जुन्या टाक्यानांच स्वतंत्र नळ कनेक्शन द्यावे.
गोकुळ बिर्ला, रहिवासी
मनपाने ही योजना राबविताना नागरिकांची चर्चा करायला हवी होती. त्यांचे अभिप्राय मागावायला हवे होते. मनपाने अशी कुठलीही प्रक्रिया न केल्यामुळे नागरिक या योजनेविषयी संभ्रमात आहेत. यात नागरिकांचे नुकसान होणार आहे.
-प्रा. किशोर राजे, रहिवासी
इन्फो :
अपार्टमेंटमध्ये प्रत्येकाच्या स्वतंत्र अशा १२ टाक्या आहेत. नवीन टाकी उभारायला कुठेही जागा नाही, तसेच इतक्या रहिवाशांना एकच नळ कनेक्शन दिल्यास, पाणी कसे होणार, हा प्रश्न पडत आहे.
-रेखा बिर्ला, रहिवासी