जामनेरला यंदा कापूस लागवड घटली, मका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 19:35 IST2018-07-14T19:34:58+5:302018-07-14T19:35:26+5:30
कृषी विभागाचा पेरणी अहवाल : बोंडअळीने शेतकरी चिंतेत

जामनेरला यंदा कापूस लागवड घटली, मका वाढला
जामनेर, जि.जळगाव : गेल्या वर्षी कापसाला मिळालेला कमी हमीभाव व बोंडअळीमुळे झालेले नुकसान यामुळे यंदा खरीप हंगामात तालुक्यात कापूस लागवड क्षेत्र तीन हजार हेक्टरने घटले आहे. याउलट मक्याची लागवड वाढली असल्याचे कृषी विभागाच्या पीक पेरणी अहवालावरून स्पष्ट होते. १२ जुलैपर्यंत ९८.४८ टक्के पेरण्या झाल्याचे अहवालात नमूद केले आहे.
महिन्यापासून होत असलेल्या पावसाने नदी, नाल्यांना पूर आलेले नसले तरी पिकांची स्थिती समाधानकारक असल्याचे सांगितले जात आहे.
तालुक्याचे सर्वसाधारण लागवड क्षेत्र १ लाख १ हजार ६६० हेक्टर आहे. १२ जुलैपर्यंत १ लाख ११२ हेक्टरवर लागवड झाली. ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, तीळ व केळीच्या लागवडीत घट दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी केळी लागवड मोठ्या प्रमाणात होत असे. पुरेशा पाण्याअभावी केळीच्या लागवड क्षेत्रात घट होत असल्याचे दिसून येते. या हंगामात फक्त ९२३ हेक्टरमध्ये केळी लागवड झाल्याचे दिसत आहे. वाघूरच्या बँकवॉटर क्षेत्रात केळी लावली जात आहे.
गळीत धान्यात वाढ
गळीत धान्याच्या लागवडीत यंदा चांगलीच वाढ झाल्याचे दिसत आहे. भुईमुगाचे सर्वसाधारण लागवड क्षेत्र १२४ हेक्टर असून, यंदा ४४२ हेक्टरमध्ये लागवड झाली आहे. सोयाबीनचे लागवड क्षेत्र १३४८ असून, यंदा २७७६ हेक्टर लागवड झाली. कडधान्यात तूर लागवड वाढली आहे.
गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने उन्हाळ्यात शेतातील विहिरींचे पाणी आटल्याने यंदा बागायती कापसाचे लागवड क्षेत्र घटले.
दरम्यान, १३ जुलैपर्यंत तालुक्यात १५५.३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, पावसाची सरासरी टक्केवारी २१.५ इतकी आहे. गेल्यावर्षी ही टक्केवारी १५.८ होती.
जामनेरला होत असलेल्या पावसाने नद्यांना पूर आलेले नसले तरी पिकांची स्थिती समाधानकारक आहे.