जळगावात डाळींचे दर स्थिर, गव्हाच्या दरात १०० रुपयांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 11:30 AM2018-10-18T11:30:16+5:302018-10-18T11:33:21+5:30

बाजारगप्पा : गेल्या आठवड्याच्या  तुलनेत जळगाव शहरातील बाजारात मोठी उलाढाल झाली असली तरी, दाळींचे दर स्थिर आहेत.

In Jalgaon, the rate of pulses was steady, at a rate of 100 rupees increased for wheat | जळगावात डाळींचे दर स्थिर, गव्हाच्या दरात १०० रुपयांनी वाढ

जळगावात डाळींचे दर स्थिर, गव्हाच्या दरात १०० रुपयांनी वाढ

Next

- अजय पाटील (जळगाव)

गेल्या आठवड्याच्या  तुलनेत जळगाव शहरातील बाजारात मोठी उलाढाल झाली असली तरी, दाळींचे दर स्थिर आहेत. तर एकीकडे गव्हाच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत १०० रुपयांची वाढ झाली आहे. अनेक ग्राहक आपल्या घरात सहा महिन्यांसाठी धान्य जमा करून ठेवतात. त्यामुळे सध्या गव्हाला मागणी वाढली असल्याची माहिती दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली. 

सध्या बाजारात गव्हाची आवक अत्यल्प आहे. मध्यप्रदेशातून पाच ट्रक माल गव्हाची आवक शहरात होत आहे. मात्र, मागणी खूप आहे. गेल्या आठवड्यात १४७ या जातीच्या गव्हाचे भाव प्रतिक्विंटल २४०० इतके होते. तर सध्या २५०० रुपये प्रतिक्विंटल भाव गव्हाला आहे. तर लोकवन गव्हाचे भावदेखील २३०० वरून २४५० पर्यंत वाढले आहेत. दिवाळीसाठी रवा, मैदा तयार करण्यासाठी गव्हाला अधिक मागणी असल्याची माहिती पगारिया यांनी दिली. 

दाळींच्या दरात फारशी वाढ किंवा घट झाली नसून गुणवत्ता पाहून सध्या उडीद व मुगाला भाव ठरविला जात आहे. गेल्या आठवड्यात मूग दाळींचे भाव ६४०० ते ६६०० रुपये प्रतिक्विंटल इतके होते. सध्या हेच भाव असून, चांगल्या दर्जाच्या मुगाच्या दाळीला ६८०० ते ७००० रुपयांपर्यंत भाव दिला जात आहे.  उडदाच्या भावात शंभर रुपयांची घसरण झाली असली तरी चांगल्या दर्जाच्या मालाला भाव चांगला आहे. बाजार समितीमध्ये या आठवड्यात मुगाची आवक झालीच नाही. एकाही शेतकऱ्याने बाजार समितीत माल विक्रीसाठी आणला नसल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर उडदाची आवकदेखील या आठवड्यात केवळ ११३ क्विंटल इतकीच झाली आहे.

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे जिल्ह्यात लवकरच खरेदी केंद्र सुरू होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना माल देणे थांबविले असल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली आहे. सोयाबीनच्या दरात २०० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या बाजारात २९०० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटल या दराने सोयाबीनची विक्री होत आहे. मात्र, बाजारात सोयाबीनची आवकदेखील खूप कमी आहे. सध्या बाजार समितीमध्ये २४५ क्ंिवटल सोयाबीनची आवक झाली आहे.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत तांदळाच्या दरातदेखील कोणतीही घट किंवा वाढ झालेली नाही. तूर दाळीच्या दरातदेखील प्रतिक्विंटल ५० रुपयांची तर चना दाळीत  १०० रुपयांची किरकोळ घट झाली आहे. तर इतर धान्याची आवकदेखील बाजारत बऱ्यापैकी आहे. ज्वारीचे सध्याचे दर १४०० ते १५६० इतके आहेत. दादार २१०० ते २१२५ इतक्या दराने खरेदी केली जात आहे. दरम्यान, एकीकडे शासकीय हमीदराने शेतमालाची खरेदी करावी, असे आदेश शासनाचे असताना दुसरीकडे मात्र काही व्यापारी या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता दाखवीत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

Web Title: In Jalgaon, the rate of pulses was steady, at a rate of 100 rupees increased for wheat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.