जीवनात संतुलनाला महत्व द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 19:42 IST2019-12-09T19:42:41+5:302019-12-09T19:42:49+5:30
श्रवणानंद सरस्वती महाराज : भागवत कथा

जीवनात संतुलनाला महत्व द्या!
जळगाव : मनुष्याचे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ आहे. त्यातील दोन तर लोकांनी बाजूलाच टाकले आहे. धर्म आणि मोक्ष भेटायचे असेल तर भेटेल असे झाले आहे. इतर दोन पुरुषार्थ अर्थ आणि काम कमविण्यासाठी सर्व मागे लागले आहे. पण लक्षात ठेवा जर तुमच्याकडे संतुलन नसेल तर तुमच्या जीवनाचे संतुलन खराब होईल, असे स्वामी श्रवणानंद सरस्वती महाराज यांनी सांगितले.
श्री सिद्धी वेंकटेश देवस्थानातर्फे सागर पार्क मैदानावर आयोजित २१ दिवसीय श्रीमद् भागवत कथा महोत्सवाच्या सातव्या दिवशी निरूपण करताना ते बोलत होते.
महाराज पुढे म्हणाले की, आपण जेव्हा गर्भात होतो तेव्हा आपले पाय वरच होते. उत्तानपाद जीवच असतो. जीवाचे नाव उत्तानपादच आहे. उत्तानपादाच्या दोन बुद्धी असतात. हे निश्चित आहे बुद्धी जिवाला सुखी बनविण्याचा प्रयत्न करते. अनेकवेळा एका बुद्धीला असे वाटते की आपण जर धर्मपूर्वक जीवन व्यतीत केले तर कधीच धन कमवू शकणार नाही. आजकाल तर लोकांना असा भ्रमच झाला आहे की, आपण खोटे बोलणार नाही, फसवणूक करणार नाही तर आपल्याकडे धन येणार नाही. पुरुषार्थ त्याचे एक माध्यम होऊ शकते. माणसाला यश त्याच्या नशिबाने मिळते परंतु नशिबवान नको पुरुषार्थवादी व्हा, कारण कुणाचेही भाग्य पुरुषार्थशिवाय होत नाही. आज जे आपले भाग्य आहे ते कधीतरी आपले पुरुषार्थ होते, असे स्वामीनी सांगितले. या कथेत विठ्ठलाची सजीव आरास साकारण्यात आली होती.