निम्म्या जिल्ह्यात भूजल पातळी ४ मीटरने खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 12:45 IST2019-05-18T12:45:09+5:302019-05-18T12:45:44+5:30

३ ते ४ वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती

In the Himalayan district, ground water level decreased by 4 meters | निम्म्या जिल्ह्यात भूजल पातळी ४ मीटरने खालावली

निम्म्या जिल्ह्यात भूजल पातळी ४ मीटरने खालावली

जळगाव : गेल्या ३ ते ४ वर्षांपासून दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या जळगाव जिल्ह्याला यावर्षी भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जळगाव जिल्ह्यातील ६६ पाणलोट क्षेत्रांमध्ये जानेवारी महिन्यात केलेल्या भूजल सर्वेक्षणात धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी ७ ते ८ तालुक्यांमध्ये भूजल पातळी तब्बल ४ मीटरने खालावली आहे. विशेष म्हणजे केळी लागवड होणाºया जळगाव, यावल, रावेर आणि मुक्ताईनगर या तालुक्यांमध्ये भूजल पातळी सर्वात जास्त घटली असल्याचे विदारक चित्र आहे. १० क्षेत्र अतिशोषित भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून दरवर्षी जानेवारी, मार्च, मे आणि आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यात भूजल पातळीचे सर्वेक्षण केले जाते. जळगाव जिल्ह्यात ६६ पाणलोट क्षेत्रात असलेल्या १७८ विहिरींच्या जलपातळीची नोंद या सर्वेक्षणात घेतली जाते. यावर्षी जानेवारी महिन्यात केलेल्या भूजल सर्वेक्षणात जिल्ह्यातील ७ ते ८ तालुक्यांमध्ये भूजल पातळी तब्बल ४ मीटरपर्यंत खालावली असल्याचे समोर आले आहे. त्यात ६६ पाणलोट क्षेत्रांपैकी १२ क्षेत्र हे अंशत: शोषित, २ क्षेत्र शोषित, १० क्षेत्र अतिशोषित आहेत. उर्वरित क्षेत्र हे अद्याप धोकादायक नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. जिल्ह्याची भूजल पातळी सातत्याने घटत असल्याने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून डार्कझोन जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये नव्याने कूपनलिका करणे, विंधन विहिरी खोदणे यावर बंदी घातली आहे. यावल तालुक्यात मोठी घट काही तालुक्यांमध्ये भूजल पातळी अर्धा मीटरने तर काही तालुक्यांमध्ये तब्बल साडेतीन ते चार मीटरने घटली आहे. सर्वात जास्त भूजल पातळी घटलेल्या तालुक्यांमध्ये यावल (३.९७ मीटर), रावेर (३.९४ मीटर), जळगाव (२.८१ मीटर), बोदवड (२.८० मीटर), मुक्ताईनगर (२.०४ मीटर) या तालुक्यांचा समावेश आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये भूजल पातळी अद्याप फारशी घटली नसली तरी प्राथमिक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने विचार करायला भाग पाडणारी आहे. जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाआधारे केंद्रीय भूजल मंडळाने २०११ मध्ये जाहीर केलेल्या भूजल मूल्यांकनानुसार जळगाव जिल्ह्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. त्यात आता पुन्हा जिल्ह्यात गेल्या ३ ते ४ वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने अधिक भर पडली आहे. मागील वर्षाच्या सरासरीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्याची भूजल पातळी अजून घटली आहे. सातत्याने घटत जाणारी भूजल पातळी ही धोक्याची घंटा असून जलसंधारणाच्या बाजूने विचार करायला लावणारी असल्याचे मत जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. शासनाने या समस्येवर मात करण्यासाठी उपाययोजना म्हणून जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे, अशीही मागणी शेतकºयांनी केली आहे. जिल्ह्यात पाणलोट क्षेत्र निहाय तसेच तालुका निहाय भूजल पातळी मोजली जाते. यामध्ये जवळपास ३ ते ४ मीटरपर्यंत भूजल पातळी खालावली आहे. यात यावल, रावेर या भागात ही पातळी जास्त खालावली आहे. अजूनही सर्वेक्षण सुरू असून २५ मेपर्यंत आकडेवारी स्पष्ट होईल. - विजय जवंजाळ, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा

Web Title: In the Himalayan district, ground water level decreased by 4 meters

टॅग्स :Jalgaonजळगाव