‘करिअर कट्ट्या’तून ज्ञान व मार्गदर्शनाची गंगोत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:19 IST2021-08-26T04:19:37+5:302021-08-26T04:19:37+5:30
जळगाव : ‘मी मोठा अधिकारी किंवा उद्योजक होणार....’ असे आपण नेहमीच ऐकत असतो. अशी स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य ज्ञान ...

‘करिअर कट्ट्या’तून ज्ञान व मार्गदर्शनाची गंगोत्री
जळगाव : ‘मी मोठा अधिकारी किंवा उद्योजक होणार....’ असे आपण नेहमीच ऐकत असतो. अशी स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य ज्ञान व मार्गदर्शन मिळावे आणि प्रशासन, उद्योगात मराठी माणसाचा टक्का वाढावा या उद्देशाने खान्देशातील महाविद्यालयांमध्ये गेल्या काही महिन्यापासून ‘करिअर कट्ट्या’ची स्थापना करण्यात आली आहे. या करिअर कट्ट्यातून विद्यार्थ्यांना ज्ञान व मार्गदर्शनाची गंगोत्री निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील हा पहिला प्रयोग खान्देशात राबविला जात आहे.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, तसेच नवोदय शैक्षणिक संस्थेचे उत्तमराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय दहिवेल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच प्राचार्य आणि करिअर कट्टा समन्वयकांची सहविचार सभा पार पडली. प्रमुख अतिथी म्हणून उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश अहिरे होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, प्र-कुलगुरू डॉ. बी.व्ही. पवार, डॉ. आर.एस. पाटील, डॉ. राजेंद्र अहिरे, डॉ. ए.पी. खैरनार, वाय़.व्ही. पाटील, संजयकुमार बारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये नव ज्ञानाची निर्मिती
करिअर कट्ट्याच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात विद्यार्थ्यांमध्ये नव ज्ञानाची निर्मिती होणार आहे, असे मार्गदर्शन करताना संतोष चव्हाण यांनी सांगितले, तर विद्यार्थ्यांना योग्य ज्ञान व मार्गदर्शन देण्यासाठी करिअर कट्ट्याची स्थापना झाली असल्याचे मत यशवंत शितोळे यांनी मांडले. याचा यूपीएससी व एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौतम मोरे, आय़.यू. शेख, डॉ. जगदीश पाटील, डॉ. योगेश कोरडे, प्रा. शिवप्रसाद शेवाळे, डॉ. अरुणा नेरे, डॉ. वंदना पाटील यांनी परिश्रम घेतले.
असे आहेत जिल्हा समन्वयक
‘करिअर कट्टा’ या उपक्रमाचे फेब्रुवारी महिन्यात उद्घाटन झाले़ प्रत्यक्षात मार्च महिन्यापासून उपक्रमाला सुरुवात झाली. प्रत्येक महाविद्यालयात या कट्ट्याची स्थापना करण्यात आली असून, दिवसातून दोन तास मार्गदर्शन केले जाते. प्रत्येक महाविद्यालयात समन्वयक नेमण्यात आले असून, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात धुळे जिल्हा समन्वयक म्हणून डॉ. सचिन नांद्रे यांची, तर नंदुरबार जिल्हा समन्वयक म्हणून डॉ. किरण मराठे व जळगाव जिल्हा समन्वयक म्हणून डॉ. विजय तुंटे यांचा समावेश आहे.
४०० विद्यार्थ्यांची होणार निवड
या उपक्रमांतर्गत ‘उद्योजग व आयएएस आपल्या भेटीला’ हा कार्यक्रम घेतला जात आहे. त्यात विविध क्षेत्रांतील उद्योजक व आयएएस अधिकारी मार्गदर्शन करीत आहेत. विशेष म्हणजे, चारशे विद्यार्थ्यांची निवड ही या उपक्रमातून केली जाईल. या चारशे विद्यार्थ्यांना दिल्लीतील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.