आॅनलाईन लोकमत,
जळगाव-दि.२५,‘गणपती बाप्पा’ च्या जयघोषात शुक्रवारी गणेश मूर्तींची स्थापना झाली. त्यात दुपारी ३ वाजेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे विक्रेत्यांचे हाल झाले मात्र गणेश भक्तांचा उत्साह कायम होता.
गणेश मूर्ती घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. गुरुवारी दिवसभर पावसाची रिपरिप होती. शुक्रवारी सकाळी पावसाने थोडी उसंत घेतली. दुपारी ३ वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे काही वेळ खरेदी मंदावली. पावसामुळे काही विक्रेत्यांच्या स्टॉलमध्ये पाणी शिरले होते. यामुळे गणेशमूर्ती ठेवण्यासाठी विक्रेत्यांची धावपळ झाली. तर अजिंठा चौकातील काही विक्रेत्यांच्या मंडपात पाणी शिरल्याने काही गणेश मूर्तींचेही नुकसान झाले.
पावसातही गणेश भक्तांचा उत्साह कायमसार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकांना सुरुवात झाल्यानंतर दमदार पावसाने हजेरी लावली अन् गणेश भक्तांच्या उत्साहाला पारावर उरला नाही. गणेश मूर्तीला ताडपत्रीने सुरक्षित झाकून, ढोल-ताशांच्या गजरातच मिरणूका काढण्यात आल्या. जसा-जसा पावसाचा वेग वाढत होता, तसतसा गणेश भक्तांचा उत्साह वाढत होता. भक्तांकडून‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर सारखा सुरु होता.
पावसानंतर गडगडले भावदुपारी जोरदार पावसानंतर गणेश मूर्तींचे भाव घसरले. दुपारी १ वाजेपर्यंत ५०० रुपयांना मिळणारी मूर्ती दुपारी ४ वाजता ३०० रुपयांना मिळत होती. तर १ हजार रुपयाला मिळणारी मूर्ती ७०० ते ८०० रुपयांमध्ये विक्री करण्यात आली. पावसानंतर देखील बाजारपेठांमध्ये भाविकांची गर्दी कायम होती.
शाडू मातीच्या गणेश मूर्तींचा तुटवडाशाडू मातीच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तींबाबत व्यापक जनजागृती झाल्यामुळे गणेश भक्तांकडून शाडू मातीच्या गणेश मूर्तींनाच प्राधान्य देण्यात आले. मात्र टॉवर चौक, अजिंठा चौक परिसरात शाडू मातीच्या मूर्तींचा तुटवडा दिसून आला. अनेक विक्रेत्यांकडे या मूर्ती उपलब्ध नव्हत्या, त्यामुळे गणेश भक्तांना इच्छा असूनही नाईलाजास्तव प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती खरेदी कराव्या लागल्या.