जळगावात ९९८ कोटींची कर्जमाफी होऊनही शेतकरी सावकारांच्या दारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 08:43 AM2018-12-16T08:43:28+5:302018-12-16T08:49:07+5:30

९९ नोंदणीकृत सावकारांनी दिलेय दीड कोटींचे कर्ज: ५ अवैध सावकारांवर झालीय कारवाई

Farmers facing problems over Debt relief in Jalgaon | जळगावात ९९८ कोटींची कर्जमाफी होऊनही शेतकरी सावकारांच्या दारी

जळगावात ९९८ कोटींची कर्जमाफी होऊनही शेतकरी सावकारांच्या दारी

Next

- सुशील देवकर

जळगाव : शासनाकडून जिल्ह्णात आतापर्यंत तब्बल ९९८ कोटींची कर्जमाफी दिल्याचा दावा केला जात असला तरीही बहुतांश शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालेला नाही. त्यामुळे त्यांना खरीपासाठी कर्जच मिळू शकले नाही. त्या शेतक-यांना नाईलाजाने सावकारांच्या दारी जाण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत ९९ सावकारांनी या वर्षी ९३० शेतक-यांना १ कोटी ४३ लाखांचे कर्ज दिले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र अवैध सावकारांकडील आकडेवारी अधिक असण्याची शक्यता आहे.

शेतक-यांना बँक, सोसायट्यांकडून हंगामात व वैयक्तिक कारणासाठी कर्ज न मिळाल्यास त्यांना नाईलाजाने सावकाराकडे हात पसरावा लागतो. सावकार नोंदणीकृत असेल तर शासनाने ठरवून दिलेल्या दराने व्याज आकारणी करतो. मात्र बहुतांश शेतकरी गावातीलच अवैध सावकारी करणा-यांकडून रक्कमेची उचल करतात. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. जिल्ह्णात नोंदणीकृत सावकारांसोबतच अवैध सावकारांकडेही मोठ्या प्रमाणावर शेतक-यांना नाईलाजाने जावे लागत आहे. सहकार विभागाने टाकल्या ९ धाडी जिल्ह्यात अवैध सावकारी जोरात सुरू असल्यानेच शेतक-यांच्या परिस्थितीचा, गरजेचा गैरफायदा घेण्याचे, त्यांना लुबाडण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.

मात्र पुन्हा त्याच सावकाराकडे हात पसरावे लागणार असल्याचे माहिती असल्याने शेतकरी तक्रार करण्यास धजावत नाही. तरीही वर्षभरात सहकार विभागाने जिल्ह्णातील अवैध सावकारांवर ९ धाडी टाकून त्यापैकी २ प्रकरणी ५ आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच सावकारांनी शेतक-यांकडून हडप केलेली स्थावर मालमत्ता परत करण्याच्या संदर्भात एकूण ६ प्रकरणात कलम १८ अन्वये सहकार विभागाकडे सुनावणी सुरू आहे. उघडकीस आलेली प्रकरणे ही केवळ हिमनगाचे टोक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

चार वर्षात सावकारांची संख्या कायम
अवैध सावकारांकडून शेतक-यांची लुबाडणूक होत असल्याने शासनाने त्याला आळा घालण्यासाठी सावकारांना परवाने देण्याची पद्धत सुरू केली आहे. या नोंदणीकृत सावकारांना शासनच कृषी कर्ज व बिगर कृषी कर्ज, तारणी कर्ज व बिगर तारणी कर्ज असे चार प्रकारांसाठी व्याजदर ठरवून देत असते. या नोंदणीकृत सावकारांची संख्या गेल्या चार वर्षांपासून कायम आहे. २०१५-१६ मध्ये ९८ नोंदणीकृत सावकार होते. २०१६-१७ मध्ये ही संख्या ८९ झाली. २०१७-१८ मध्ये १०३ तर २०१८-१९ मध्ये नोंदणीकृत सावकारांची संख्या ९९ झाली आहे.

९३० शेतकऱ्यांना दिले कर्ज
जिल्ह्णात यंदा ९९ सावकारांनी नोंदणी केली असून त्यांनी आतापर्यंत ७८० शेतक-यांना (व्यक्तींना) सोने, जमीन तारणावर १ कोटी १२ लाख २२ हजार रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. तर १५० शेतक-यांना ३१ लाख ८ हजारांचे कर्ज वाटप केले आहे. बँकांनी हात वर केल्याने शेतक-यांना नाईलाजाने सावकाराची पायरी चढावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title: Farmers facing problems over Debt relief in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी