दुरुस्ती न केल्याने भुयारी गटारीच्या बुजलेल्या चाऱ्या ठरताहेत धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST2021-07-22T04:12:22+5:302021-07-22T04:12:22+5:30

मनपानेही केली नाही दुरुस्ती : चाऱ्यांमध्ये घसरून अनेकजण होताहेत जखमी ; पावसाळ्यातील व्यथा कायम रिॲलिटी चेक- अजय पाटील लोकमत ...

Failure to repair can lead to overflowing sewers | दुरुस्ती न केल्याने भुयारी गटारीच्या बुजलेल्या चाऱ्या ठरताहेत धोकादायक

दुरुस्ती न केल्याने भुयारी गटारीच्या बुजलेल्या चाऱ्या ठरताहेत धोकादायक

मनपानेही केली नाही दुरुस्ती : चाऱ्यांमध्ये घसरून अनेकजण होताहेत जखमी ; पावसाळ्यातील व्यथा कायम

रिॲलिटी चेक- अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील रस्त्यांची समस्या बिकट होत जात असून, महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतरदेखील जळगावकरांना खराब रस्त्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच भुयारी गटार योजनेतंर्गत अंतर्गत रस्त्याचा मधोमध खोदलेल्या चाऱ्या मनपाने वेळेवर दुरुस्त न केल्यामुळे या चाऱ्या वाहनधारकांसाठी धोकेदायक ठरत आहेत. या चाऱ्यांमध्ये अनेक वाहने घसरत असल्याने शहरात लहान-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. या चाऱ्या आता धोकादायक ठरत असून, मनपाच्या ढिसाळ कामकाजाचा फटका जळगावकरांना सहन करावा लागत आहे.

अमृत अंतर्गत शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. पाणी पुरवठा योजनेप्रमाणे पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेले रस्ते, नंतर दुरुस्त करण्याची जबाबदारी ही मक्तेदारावर न ठेवता मनपाकडेच घेतली होती. निविदा प्रक्रियेत मनपा अभियंत्यानी केलेल्या ढिसाळ नियोजनाचा फटका आता जळगावकरांना बसत आहे. कारण, जळगाव शहरात भुयारी गटार योजनेतंर्गत सुमारे २०० किमीचे रस्ते फोडण्यात आले असून, त्याची दुरुस्ती न झाल्यामुळे हेच रस्ते पावसाळ्यात जळगावकरांसाठी धोकेदायक ठरत आहेत.

आर. आर. विद्यालय परिसर

स्टेडियम कॉम्प्लेक्सकडून आर. आर. विद्यालयाकडे जाणारा रस्ता अगदी मधोमध खोदण्यात आला होता. हा रस्ता खोदल्यानंतर ठेकेदाराकडून माती टाकून हा रस्ता दुरुस्त करण्यात आला. मात्र, आता पावसामुळे ही माती रस्त्यावर पसरली असून, चारीदेखील मुख्य रस्त्यापासून खाली सरकली आहे. यामुळे वाहन चालविताना वाहन जर चारीमध्ये गेले तर वाहनधारक घसरण्याची शक्यता अधिक असते. तसेच आतापर्यंत या रस्त्यावर पाऊस झाल्यानंतर दररोज अनेक वाहनधारक घसरून पडत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे अनेक वाहनधारक पाऊस झाल्यानंतर या रस्त्याने जाणे टाळत आहेत.

भजे गल्लीत जाताहात तर सावधान..

भजे गल्लीत तर सिमेंटचा रस्ता अगदी मधोमध फोडून टाकला आहे. विशेष म्हणजे मुख्य रस्त्यांपासून हा रस्ता काही सेंमी खाली सरकला आहे. तसेच या रस्त्यावर वर्दळदेखील मोठ्या प्रमाणात राहत असल्याने या रस्त्यावर दररोज अपघात होत आहेत. तसेच रस्त्याचा एका बाजूला हॉकर्सने आपली दुकाने थाटलेली असल्यामुळे वाहनधारकांना चाऱ्यामधूनच वाहने चालविण्याशिवाय पर्याय नसतो. यामुळे याठिकाणी अपघातांची संख्यादेखील अधिक आहे.

या भागातही हीच परिस्थिती

मुख्य बाजारपेठ परिसरासह शहरातील चित्रा चौक, पोलन पेठ, बालगंधर्व नाट्यगृह परिसर, शिवाजी नगर, आर्किड रुग्णालय परिसर, सुभाष चौक, नेहरू चौक परिसर, शनिपेठ परिसर, जुना कापड बाजार, बळीराम पेठ या भागांमध्ये देखील हीच समस्या कायम असून, पाऊस झाल्यानंतर रस्त्यावर वाहने चालविणे म्हणजे एखादा धोका पत्करण्यासारखेच आहे.

कानळदा रस्त्यापेक्षा गावातील शेतरस्ता बरा

केसी पार्क ते एस के ऑईल मिल रस्त्यादरम्यानदेखील भुयारी गटार योजनेचे काम झाले आहे. या रस्त्याची परिस्थिती आधीच खराब होती. त्यातच रस्ता खोदल्यामुळे या ठिकाणी रस्तादेखील आता शिल्लक राहिलेला नाही. एखाद्या गावातील शेतरस्ता तरी चांगला म्हणावा अशी परिस्थिती कानळदा रस्त्याची झाली आहे. रस्त्याचा त्रास होत असल्याने अनेक वाहनधारक फुपनगरी फाट्यापासून ममुराबादमार्गे तब्बल पाच किमीचा फेरा टाकून येणे पसंत केले आहे.

मुरूम टाकला असता तरी वाचला असता त्रास

मनपा प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रभागनिहाय ५० लाख याप्रमाणे एकूण ९ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद केली होती. मात्र, या निधीपैकी ठराविकच प्रभागांमधून काम पूर्ण झाले. तर इतर प्रभागांमध्ये निधी मंजूर होऊनदेखील ठेकेदारांनी काम करायला नकार दिल्यामुळे काम होऊच शकले नाही. मनपा प्रशासनाने जर या चाऱ्यांमध्ये मुरूमदेखील टाकला असता तरी या समस्येपासून काही प्रमाणात दिलासा तरी मिळू शकला असता. मात्र, मनपाच्या ढिसाळ कामांचा फटका नागरिकांना बसत आहे.

Web Title: Failure to repair can lead to overflowing sewers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.