आश्वासनानंतर शेवटच्या अर्धा तासात माघारीसाठी अपक्षांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 19:48 IST2018-07-17T19:44:54+5:302018-07-17T19:48:57+5:30
मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून आश्वासने व आमिष मिळाल्यानंतर अखेरच्या अर्धा तासात अर्ज मागे घेण्यासाठी अपक्ष व बंडखोर उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली.

आश्वासनानंतर शेवटच्या अर्धा तासात माघारीसाठी अपक्षांची धावपळ
जळगाव - मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून आश्वासने व आमिष मिळाल्यानंतर अखेरच्या अर्धा तासात अर्ज मागे घेण्यासाठी अपक्ष व बंडखोर उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत काही मोजक्या उमेदवारांनी माघार घेतली मात्र, दुपारी २ ते ३ या एका तासात अनेक उमेदवारांनी माघार घेतली. तर काही उमेदवार मुदत संपल्यानंतर मनपात पोहचल्याने ते माघार घेवू शकले नाही.
सोमवारपर्यंत २४ उमेदवारांनी माघार घेतली होती. मात्र, १७६ हून अधिक अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे अनेक उमेदवारांचे गणित यामुळे बिघडण्याची शक्यता होती. सोमवारी रात्री अपक्ष उमेदवारांच्या घरी जावून राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अपक्ष उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विनवण्या केल्या. हे प्रकार मंगळवारी सकाळपर्यंत सुरु होते. त्यामुळे शेवटच्या अर्धातासात अनेक उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली.