नोटाबंदीचे ग्रहण अजूनही सुटलेले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 19:22 IST2019-11-09T19:21:18+5:302019-11-09T19:22:01+5:30
तीन वर्षे पूर्ण : अनेक व्यवसाय-उद्योग मंदीच्या कचाट्यात

नोटाबंदीचे ग्रहण अजूनही सुटलेले नाही
जळगाव : नोटाबंदीला शनिवारी तीन वर्षे पूर्ण होत असून या तीन वर्षात मंदीच्या कचाट्यात सापडलेले अनेक व्यवसाय अजूनही बाहेर पडण्याची चिन्हे नाहीत. नोटाबंदीमुळे लोकांचे नुकसान झाले आहेच; शिवाय अनेक व्यवसायांचे नुकसान झाले आहे. काही ठराविक उद्योग वगळता अन्य उद्योगधंद्यांची स्थिती वाईटच असल्याची प्रतिक्रिया व्यावसायिकांनी दिली.
काही ठराविक उद्योग वगळता अनेक उद्योगांना या नोटाबंदीचा मोठा फटका बसला असून घाऊक व्यापाऱ्यांचा रोखीचा व्यवहारच थांबून गेला आहे. गेली तीन वर्षे आपण या मंदीचा सामना करतो आहोत. आता चेक, आॅनलाईन व्यवहार वाढलेत तर रोखीचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून येणारा मोठा ग्राहकवर्ग या व्यावसायिकांकडील ग्राहकयादीतून नाहीसाच झाला आहे तर काही व्यवसाय आता हळूहळू सावरू लागले आहेत. मात्र, सध्या होत असलेल्या व्यवसायापेक्षा कैकपटीने व्यवसाय हा पूर्वी होत होता. आता नोटाबंदीमुळे ग्राहक अडचणीत सापडला आहे. ग्राहक अडचणीत असल्यामुळे आपोआपच व्यावसायिकही संकटात सापडल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
-९ नोव्हेंबर २०१६ रोजी पाचशे आणि हजारच्या नोटांवर बंदी आली आणि त्यानंतर ठराविक मुदतीत या नोटा ग्राहकांना बदलून मिळणार होत्या.
-या नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर येईल, असा विश्वास केंद्र शासनाने व्यक्त केला होता.
-मात्र प्रत्यक्षात उभारी घेतलेल्या व्यावसायिकांचे व्यवसाय या नोटाबंदीमुळे कोलमडून पडले आहेत.