पालिकेच्या दुर्लक्षामुळे नदीचे पात्रच गायब..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:17 IST2021-05-25T04:17:35+5:302021-05-25T04:17:35+5:30

चाळीसगाव : शहर दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. एक डोंगरी, तर दुसरी तितूर. शहराच्या मध्यभागी या दोन्ही नद्यांचा ज्या ...

Due to the negligence of the municipality, the river bed disappears .. | पालिकेच्या दुर्लक्षामुळे नदीचे पात्रच गायब..

पालिकेच्या दुर्लक्षामुळे नदीचे पात्रच गायब..

चाळीसगाव : शहर दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. एक डोंगरी, तर दुसरी तितूर. शहराच्या मध्यभागी या दोन्ही नद्यांचा ज्या ठिकाणी संगम होतो, तेथे विस्तीर्ण नदी पात्र आहे. या संगमावर कधीकाळी काचेसारखे स्वच्छ पाणी, पाण्यातील चमकणारे मासे व आजूबाजूला मोठी झाडे ही शहराच्या नदीची खरी ओळख होती. मात्र आता पालिकेच्या दुर्लक्षामुळे नदीचे पात्रच गायब झाले असून, रासायनिक पाणी, सांडपाणी आणि त्यात वाढलेले बाभळीचे रान त्यामुळे याठिकाणी उकिरडे तयार होऊन दुर्गंधी सुटली आहे.

दोन गटारांचा संगम झालेल्या ठिकाणी सध्या भीषण वास्तव दिसून येते. शहरातील पूर्व-पश्चिम भागातील सांडपाण्यासह विविध छोट्या-मोठ्या कारखान्यांमधून सोडले जाणारे विनाप्रक्रिया घातक रासायनिक पाणी यामुळे या दोन नद्या मृत झाल्या आहेत. काठावर उभे राहिले तर पाण्यातून येणारी प्रचंड दुर्गंधी, असह्य करणारी आहे. साबणाच्या पाण्यासारखा फेस मोठ्या प्रमाणात प्रवाहात दिसून येतो. शहरातील सर्व डंपिंग कचरा या नदीपात्रात पडल्याने घाणेरडा, कुबट वास येतोय. आजूबाजूला दोन्ही बाजूंनी उकिरडे तयार झाले आहे. त्यातच वेड्या बाभळीचे रान, काटेरी झुडपं, कचरा नदीपात्रात फोफावला आहे.

पुलावर बसणारे भाजी, फळ, मांस विक्रेते संध्याकाळी घरी परत जाताना सडलेल्या मांसासह विविध भाज्या व कचरा याच नदीपात्रात टाकून जातात. कधीकाळी शहराची ओळख असणारे हे नदीपात्र, आज भयावह स्थितीत पोहोचले आहे. काही दिवसांच्या अंतरावर येणाऱ्या पावसाळ्यात सफाई व खोलीकरण करण्याची गरज आहे. अन्यथा प्रत्येक वर्षी पूर येण्याची परिस्थिती ‘जैसे थे’ असेल व आजूबाजूच्या दुकानात हे सांडपाणी जाऊन नुकसान होईल, अशी भावना नागरिक व दुकानदार यांनी व्यक्त केली.

तितूर नदीपात्रात सुशोभीकरणाच्या नावाखाली करण्यात आलेल्या अतिक्रमणांमुळे नदीचे पात्र गायबच झाले आहे. पालिका विभाग यांनी शहरातून जाणाऱ्या नदीच्या पात्राची रुंदी निश्चित केली नसल्यामुळे अन् नुकताच नदीवर बांधण्यात आलेला चित्रविचित्र आकाराचा लोखंडी पूल व त्याची लांबी पाहता या नदीचे पात्र किती आहे, याचा अंदाज सहज येतो. मात्र, पालिकेच्या दुर्लक्षामुळे नदीचे पात्रच गायब झाले अन् विद्रुपीकरण झाले आहे. पूररेषेची आखणी केलेली नाही. तितूर नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला तर प्रत्येक वर्षी त्याचा फटका परिसरात राहणाऱ्या लोकांना बसतो.

...................

चौकट..

प्रशासनाच्या चुकांमुळे येतो अचानक पूर?

चाळीसगाव नगरपालिकेच्या नियोजनाअभावी व चुकांमुळे शहरातील तितूर नदीला पूर येतो. या पुराचे पाणी नदी शेजारील अनेक घरे, दुकानांमध्ये शिरते. त्यामुळे व्यापाऱ्यांची तारांबळ उडते व प्रचंड प्रमाणात नुकसान होत असते. या घटनेची माहिती पालिकेला अन् लोकप्रतिनिधी असूनही पूर आल्यावर जागे होताना दिसत आहे. छोट्या गुजरीतील पूल व हॉटेल दयानंदजवळील मोठ्या पुलाला केवळ दोन ठिकाणी पाणी पास होण्यासाठी जागा आहे. त्यामुळे वरून येणारे पाणी जास्त आणि पुलाखालून जाणारे पाणी कमी होत असल्याने बंधाऱ्याप्रमाणे हे पाणी अडवले जाऊन त्याचा ओव्हर फ्लो आजूबाजूला होतो. त्यामुळेच दुकानात पाणी जाते, असे स्पष्ट दिसते. मात्र यावर कायमचा उपाय करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.

................................

नदी स्वच्छतेसाठी दुकानदार, नागरिकांच्या सूचना..

नदीची पूररेषा व सर्व्हे नक्की केला पाहिजे. नदीतील अतिक्रमणे काढली पाहिजेत. नदीपात्रात गटारींचे पाणी सोडणे थांबवावे. नदीपात्रात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचा बंदोबस्त करावा. नदी प्रदूषणमुक्त करण्याकडेदेखील लक्ष द्यावे. त्यामुळे पूर आल्यावर दुकानात पाणी जाणार नाही याची जबाबदारी प्रशासनाने घ्यायला पाहिजे.

- मयूर फुलदेवरे, दुकानदार

शहरात दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी नदी-नाल्यांमधून गाळ उपसण्याचे काम करण्यात यावे. पावसाळ्यापूर्वी ७० टक्के आणि पावसाळा व त्यानंतरच्या काळात ३० टक्के सफाई करण्यात यावी. पावसाळ्यात पुराचे पाणी परिसरात पसरणे ही समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होते.

-विक्रांत तिवारी, नागरिक

...

===Photopath===

240521\24jal_4_24052021_12.jpg~240521\24jal_5_24052021_12.jpg

===Caption===

चाळीसगाव शहरातून तितुर नदीपात्रात वाढलेली वेड्या बाभळीचे रान, काटेरी झुडपं, कचऱ्याचा ढीग साचलेला आहे. पावसाळा सुरू होण्याआधी सफाई व खोलीकरण करण्याची मागणी दुकानदार व नागरिकांकडून होत आहे.~चाळीसगाव शहरातून तितुर नदीपात्रात वाढलेली वेड्या बाभळीचे रान, काटेरी झुडपं, कचऱ्याचा ढीग साचलेला आहे. पावसाळा सुरू होण्याआधी सफाई व खोलीकरण करण्याची मागणी दुकानदार व नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Due to the negligence of the municipality, the river bed disappears ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.