लॉकडाऊनमुळे बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 15:26 IST2020-04-24T15:24:11+5:302020-04-24T15:26:52+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग एक महिना व्यावसायिकांची दुकाने बंद राहण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Due to the lockdown, the market turnover of crores of rupees | लॉकडाऊनमुळे बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल ठप्प

लॉकडाऊनमुळे बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल ठप्प

ठळक मुद्देकोरोनाची भीती व बंदची अनिश्चितता केव्हा संपणार?तळीरामांची दारूसाठी भटकंती

मोहन सारस्वत
जामनेर, जि.जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग एक महिना व्यावसायिकांची दुकाने बंद राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. लग्नसराईच्या काळात दुकान बंद ठेवण्याची वेळ आल्याने व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. ३ मेपर्यंत बंद असून यापुढे शासन काय निर्णय घेते यावर सर्व अवलंबून असेल. सर्वच व्यापारी मोठी उलाढाल करणारे नसून, यातील बहुतेक छोटे व किरकोळ दुकानदार असून त्यांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
लॉकडाऊन काळात कापड व्यावसायिक, हॉटेल, शीतपेय विक्रेते, जनरल स्टोअर्स, झेरॉक्स , लॉटरी, सलून चालक, मोबाईल विक्री व दुरुस्ती, हातगाडीवर खाद्य पदार्थ विकणारे आदी व्यवसाय बंद झाल्याने बाजारपेठेत शुकशुकाट पसरला आहे. नोव्हेंबरपासूनच लग्नसराईला सुरुवात झाली. मार्च ते मे या तीन महिन्यात लग्नाचे मोठे मुहूर्त असतात. याच काळात कापड व्यावसायिकांसह हॉटेल, प्रिंटिंग प्रेस, वाजंत्रीवाले, डीजे चालकांचा व्यवसाय होतो.
यंदा लग्नसराई ठप्प झाल्याने त्याच्याशी निगडित अनेक व्यवसाय बंद राहिल्याने महिन्यात करोडोची उलाढाल ठप्प झाली. लॉकडाऊन मुले ग्रामीण भागातील नागरिक तालुक्याच्या ठिकाणी येत नसल्याने दुचाकी व चारचाकी जागेवरच पडून राहिल्या, परिणामी पेट्रोल, डिझेलच्या विक्रीवर मोठा परिणाम दिसून आला. वाहन रस्त्यावर न आल्याने गॅरेज चालकांचे मोठे नुकसान झाले. गॅरेजवर दुरुस्तीचे काम करणारे गरीब घरातील तरुण बेरोजगार झाल्याने त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न बिकट बनला.
जामनेरला हातगारीवर कचोरी, समोसा, बटाटा वडा, पाणी पुरी, पाव भाजी, थंड पेय विकणाऱ्यांची संख्या सुमारे तीनशे असावी एक महिन्यापासून त्यांचा व्यवसाय ठप्प झाला असून कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवावा याची चिंता त्यांना सतावत आहे. सुमारे दीडशे सलून दुकाने असून त्यांना उपासमारीचे जीवन जगावे लागत आहे.
तळीरामांची दारूसाठी भटकंती
शहरात ११ बिअर बार व देशी दारूची तीन दुकाने आहे. लॉकडाऊनमुळे सर्व दुकाने बंद आहेत. या काळात शहरासह ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले. जादा पैसे मोजून दारू मिळविण्यासाठी ‘तळीरामां’ची भटकंती होत आहे. बिअर बार व देशी दारू दुकाने बंद असल्याने शासनाचा महसूल बुडाला तो वेगळाच. मात्र काही प्रमाणात का होईना बंद दुकानातील दारू चोरट्या मार्गाने विकली गेली. याबरोबरच गुटखा शौकीन १० रुपयात मिळणारी पुडी चोरट्या मार्गाने ५० ते ७० रुपयात घेत असल्याचे सांगितले जाते.
लॉकडाऊन काळात मोठे नुकसान झाले ते प्रवासी वाहतूक करणाºया रिक्षाचालकांचे. ग्रामीण भागातून प्रवासी वाहतूक करणाºया रिक्षांची संख्या २०० असून, शहरांतर्गत प्रवासी वाहतूक करणाºया रिक्षांची संख्या १५० असावी. प्रवासी वाहतूक बंद असल्याने त्यांच्या व्यवसायावर कुºहाड पडली. आणखी किती दिवस घरात बसावे अशी चिंता असून चरितार्थ कसा चालवावा हे समजत नाही असे त्यांचे म्हणणे आहे.
२० एप्रिलपासून काही व्यवसायांना निर्बंधांसह सूट मिळाल्याने बाजारपेठेत थोडी वर्दळ दिसत आहे.

Web Title: Due to the lockdown, the market turnover of crores of rupees