धरणगाव तालुक्यासाठी गिरणा धरणातून जानेवारी-एप्रिलमध्ये आवर्तन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 21:44 IST2018-12-14T21:36:17+5:302018-12-14T21:44:15+5:30
धरणगाव तालुक्यात येत्या महिन्याभरात भीषण पाणीटंचाई भासणार असून, पूर्ण तालुक्याला टँकरने पाणी पुरवणे प्रशासनाला शक्य होणार नाही. यासाठी जानेवारी व एप्रिल महिन्यात आठ दिवसांसाठी गिरणा धरणातून दोन आवर्तन द्या, असा ठराव शुक्रवारी तालुका सरपंच मेळाव्यात करण्यात आला.

धरणगाव तालुक्यासाठी गिरणा धरणातून जानेवारी-एप्रिलमध्ये आवर्तन द्या
धरणगाव, जि.जळगाव : तालुक्यात येत्या महिन्याभरात भीषण पाणीटंचाई भासणार असून, पूर्ण तालुक्याला टँकरने पाणी पुरवणे प्रशासनाला शक्य होणार नाही. यासाठी जानेवारी व एप्रिल महिन्यात आठ दिवसांसाठी गिरणा धरणातून दोन आवर्तन द्या, असा ठराव शुक्रवारी तालुका सरपंच मेळाव्यात करण्यात आला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष पुरुनीत चौधरी होते.
धरणगाव तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य यांचा मेळावा १४ रोजी येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झाला. प्रास्ताविक तालुका अध्यक्ष सचिन पवार यांनी केले.
या वेळी जिल्हाउपाध्यक्ष श्रीकांत महाजन, तालुका उपाध्यक्ष रमेश पाटील यांनी भविष्यातील पाणीटंचाई व त्यावरील उपाय म्हणून गिरणा धरणातून दोन आवर्तने दिल्यास तालुक्यातील ८० गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. यासाठी ग्राम पंचायती योग्य तो निधी जलसंपदा खात्याकडे भरणार असल्याचा ठराव मांडला. तो एकमताने मंजूर करण्यात आला. यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालक मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना तालुक्यातील सरपंचांनी साकडे घालावे, असे ठरविण्यात आले.
या मेळाव्यात सतखेडा सरपंच कृषिभूषण शरद पाटील, धानोरा सरपंच भगवान महाजन, भोणे सरपंच बालू पाटील यांनी ग्राम पंचायतीच्या अडचणी, समस्या यावर चर्चा केली. रोजगार हमी योजना प्रभावी अंमलबजावणी यावर पष्टाणे येथील सरपंच किशोर निकम यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन व आभार व्ही. डी. पाटील यांनी केले. यशस्वितेसाठी महिला तालुका अध्यक्षा सरला पाटील, शिवदास पाटील, कैलास पाटील, मंगल पाटील, रेखा कोळी, वैशाली पाटील पंढरीनाथ पाटील यांनी परिश्रम घेतले.