जीएसटीचा परिणाम : डाळी, धान्याच्या ब्रॅण्डद्वारे ग्राहकांची फसगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 12:56 IST2019-05-30T12:56:21+5:302019-05-30T12:56:53+5:30

कोणीही वापरू लागले ब्रॅण्डचे नाव

Consequences of GST: False Consumers Through Pulses, grain brands | जीएसटीचा परिणाम : डाळी, धान्याच्या ब्रॅण्डद्वारे ग्राहकांची फसगत

जीएसटीचा परिणाम : डाळी, धान्याच्या ब्रॅण्डद्वारे ग्राहकांची फसगत

जळगाव : ब्रॅण्डेड डाळी व धान्यावर पाच टक्के जीएसटी लावण्यात आल्याने अनेकांनी तोच माल ब्रॅण्डविना विक्री करण्यास सुरुवात केल्याने संबंधित ब्रॅण्डचा वापर कोणीही करू लागले आहे. त्यामुळे ब्रॅण्डची विश्वासार्हता गमावली जात असल्याचे चित्र बाजारपेठेत आहे. यामुळे अनेक वर्षांच्या मेहतीने कमावलेला ब्रॅण्ड विक्रेत्यांना गमवावा तर लागलाच आहे सोबतच यामुळे ग्राहकांचीही फसगत होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
ब्रॅण्डविना मालाची विक्री
वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करताना सरकारने धान्यावर हा कर लावला नाही. मात्र ब्रॅण्डेड डाळी व धान्यावर पाच टक्के जीएसटी लावण्यात आल्याने त्याचा भार थेट ग्राहकांवर येऊ लागला. डाळीचे व धान्याचे भाव या मुळे वाढत असल्याने व स्पर्धेत विक्री कमी होऊ लागल्याने विक्रेत्यांनी तोच माल विना ब्रॅण्ड विक्री करणे सुरू केले.
ब्रॅण्डचा वापर कोणत्याही मालावर
मालाची किंमत वाढत असल्याने अनेकांनी आपला ब्रॅण्ड वापरणे बंद करीत विना ब्रॅण्ड मालाची विक्री सुरू केल्याने सदरचा ब्रॅण्ड इतर विक्रेते आपल्या मालावर वापरू लागल्याचे अनुभव येत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मालाचा दर्जा संबंधित ब्रॅण्डच्या तुलनेत मिळत नसल्याने यातून ग्राहकांची फसगत होऊ लागली आहे.
अनेक वर्षांची मेहनत धुळीस
मालाचा दर्जा संभाळताना अनेक उत्पादकांनी आपला ब्रॅण्ड विकसित केला. यात ग्राहकांचा विश्वास संपादीत करीत हा ब्रॅण्ड विकसित करण्यासाठी संबंधितास अनेक वर्षे मेहनत करावी लागली. मात्र आता कोणीही हा ब्रॅण्ड आपल्या मालावर वापरु लागल्याने ब्रॅण्ड निर्मात्याची अनेक वर्षांची मेहनत धुळीस मिळाल्याच्या भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
दर्जेदार मालाची शाश्वती नाही
गेल्या अनेक वर्षांपासून मालाचा दर्जा ग्राहकांच्या पसंतीस पडला तरी आता त्या संबंधित नावाच्या ब्रॅण्डचा माल खरेदी केला तरी तो ग्राहकांच्या ‘पचणी’ पडत नसल्याने संबंधित ब्रॅण्डच्या दर्जाबाबत शाश्वती राहिलेली नाही, असेही अनुभव येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
धान्यावर जीएसटी नसावा
धान्य, डाळी जीवनावश्यक वस्तूत येत असल्याने त्यावर जीएसटी नसावा, अशी मागणी ग्राहक तर करीतच आहे, सोबतच विक्रेतेही ही मागणी करीत आहे. जीएसटीमुळे विना ब्रॅण्ड माल विकावा लागत असल्याने व ब्रॅण्डचा कोणीही वापर करू लागल्याने डाळी, धान्यास जीएसटीतून मुक्तता मिळावी, अशीही मागणी होत आहे. यामुळे मालाचे दर कमी होऊन ब्रॅण्डही जपले जाईल व ग्राहकांचीही फसगत थांबेल, असा सूर विक्रेत्यांमधून उमटत आहे.

जीएसटीमुळे ब्रॅण्डचा वापर अनेकांनी बंद केल्याने त्या ब्रॅण्डचा वापर इतर विक्रेते करू लागल्याने ग्राहकांना त्या दर्जाचा माल मिळत नाही. सोबतच ब्रॅण्ड विकसित करणाºयाची अनेक वर्षांची मेहनत धुळीस मिळाली आहे.
- ललित बरडिया, उपाध्यक्ष, ‘फॅम’.

स्पर्धेत टिकण्यासाठी अनेकांनी ब्रॅण्डचा वापर बंद केला आहे. मात्र त्यातून तरीही त्या नावाचा ब्रॅण्ड बाजारात वापरला केला जात आहे. त्यासाठी डाळी, धान्यावर जीएसटी नसावा.
- संजय रेदासणी, डाळ, धान्य विक्रेते.

Web Title: Consequences of GST: False Consumers Through Pulses, grain brands

टॅग्स :Jalgaonजळगाव